
मुंबईतील (Mumbai) पावसाळासंदर्भातील कामकाजाच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरात २९ मे ते १५ जून २०२५ दरम्यान टाकाऊ साहित्य संकलनासाठी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारी २९ जून २०२५ रोजी एकाच दिवसात ५१.५ टन राडारोडा, २८.१ टन कचरा, ४१.६ टन टाकाऊ वस्तू गोळा करण्यात आले. विशेष म्हणजे दैनदिन सफाई करूनही एकाच दिवशी एवढा कचरा आणि राडारोडा आणि टाकावू वस्तू जमा झाल्याने नक्की मुंबईतील सफाई योग्य प्रकारे होते का की साफसफाईत कामचुकारपणा केला जातो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर (Kiran Dighavkar) यांच्या देखरेखीखाली घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध उपाययोजनांसोबतच निरनिराळे उपक्रमही राबविले जात आहेत.
(हेही वाचा – पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरवणाऱ्या तरुणाला ठाण्यातून अटक; ATS ची कारवाई)
याचाच एक भाग म्हणून, घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या माध्यमातून टाकाऊ साहित्य संकलनासाठी विशेष स्वच्छता मोहीम २९ मे ते १५ जून २०२५ दरम्यान राबविण्यात येत आहे. त्यासोबतच, मोहिमेत दररोज सकाळी १० वाजेपूर्वी स्वच्छता तसेच गरजेनुसार दुसऱ्यांदा झाडलोट अर्थात स्वच्छता (Second Sweeping) करण्यात येत आहे.
पावसाळ्यात नदी नाल्यांच्या परिसरात तसेच सार्वजनिक ठिकाणांवरून टाकाऊ वस्तूंचे संकलन करणे, राडारोडा उचलणे, सर्वंकष स्वच्छता करणे यावर या मोहिमेत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. जेणेकरून पावसाळ्यात सखल, अतिसखल परिसरांमध्ये पाणी साचू नये अथवा पाण्याचा निचरा होण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये, हा या मागील प्रमुख उद्देश आहे.
मोहिमेच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी २९ जून २०२५ रोजी एकाच दिवसात ५१.५ टन राडारोडा, २८.१ टन कचरा, ४१.६ टन टाकाऊ वस्तू गोळा करण्यात आले. त्यासाठी ३० डंपर, २५ जेसीबी आणि इतर मिळून ६२ मशिन्सची मदत घेण्यात आली. या कार्यवाहीमध्ये १ हजार ०७२ कर्मचारी, कामगार आणि १० स्वयंसेवक सहभागी झाले होते.
या मोहिमेत, सर्व प्रशासकीय विभाग (Ward) कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक कचरा जमा होणारी ठिकाणे शोधून त्याठिकाणी सखोल स्वच्छता, प्रामुख्याने टाकाऊ वस्तूंचे संकलन, रस्ते, गल्ली–बोळ यांची स्वच्छता, पेव्हर ब्लॉक, कडेचे दगड (Curbstone), नाले व जलवाहिनीच्या इनलेट पॉईंट्सवरील जाळ्यांची स्वच्छता इत्यादी सर्व कार्यवाही करण्यात येत आहे. जेणेकरुन पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणाऱ्या या टाकाऊ वस्तुंमुळे पाणी निचरा करताना अडथळा होवू नये, याकडे लक्ष पुरवले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community