इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर (Iran – Israel war) , भारताने इराणमधील उच्च-जोखीम असलेल्या क्षेत्रांमधून आपल्या नागरिकांना स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे आणि तेथून बाहेर काढण्याच्या पर्यायांवर सक्रियपणे विचार करत आहे, ज्यामध्ये आर्मेनिया हा एक संभाव्य मार्ग म्हणून समोर आला आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही आर्मेनियासोबत चर्चा केली आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना इराणमधील सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आर्मेनियासह अझरबैजान, तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरून बाहेर काढले जाणार आहे.
मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव (Iran – Israel war) सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले आहेत, या दोन्ही देशातील तणावामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. या युद्धात आता सामान्य लोकही सापडले आहेत. याचा परदेशी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरही परिणाम होत आहे. काल रात्री तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मुलांच्या वसतिगृहाजवळ हल्ला झाला. या हल्ल्यात दोन भारतीय विद्यार्थी जखमी झाले. हे दोन्ही विद्यार्थी जम्मू आणि काश्मीरचे आहेत.
(हेही वाचा Israel Iran Conflict : इराणमध्ये अडकले १५०० भारतीय विद्यार्थी)
दोन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि विद्यापीठ प्रशासनाने त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना रामसर येथे हलवले आहे. या घटनेमुळे इराणमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावास या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी इराणसोबत चर्चा करत आहेत. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार एक मोहीम सुरू करणार आहे. ‘भारतीयांसह परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात सुरक्षितपणे पाठवले जाईल’, असं इराण सरकारने म्हटले आहे. (Iran – Israel war)
Join Our WhatsApp Community