Independence Day 2023 : जगाला दखल घ्यायला लावणारी भारतीय UPI प्रणाली

Independence Day 2023 : UPI पेमेंट्सचा इतका यशस्वीपणे केलेला वापर हे भारताने जगासमोर ठेवलेलं एक उदाहरण आहे. आणि जगाच्या दृष्टीने आणि रुपयाच्या बळकटीकरणात UPI इथून पुढे महत्त्वाचं ठरणार आहे. कसं ते बघूया…

116

एकट्या जुलै महिन्यात देशांतर्गत युपीआय व्यवहार जवळ जवळ १० अब्ज इतके होते. अगदी अधिकृत आकडा सांगायचा तर ९.९६ अब्ज. आणि या व्यवहारांचं एकूण मूल्य होतं 15 लाख कोटी रुपयांच्या घरात. प्रत्यक्ष चलन न वापरताना करायच्या व्यवहारांसाठी क्रेडिट कार्डाचा वापर सुरू झाला त्या गोष्टीला 30 वर्ष उलटली. पण, अजून क्रेडिट कार्डावर एका महिन्यात इतके व्यवहार झालेले नाहीत.

युपीआयला अल्पावधीत मिळालेल्या यशानंतरही ही प्रणाली चालवणारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही संस्था संतुष्ट नाही. कारण, त्यांचं उद्दिष्टं आहे महिन्याला १ अब्ज व्यवहार करण्याचं. आताचा युपीआय विकास दर बघितला तर तो ४०% आहे. म्हणजे दरवर्षी युपीआय व्यवहारांचं प्रमाण ४० टक्क्यांनी वाढतंय. ते तसंच राहिलं तर दैनंदिन १ अब्ज व्यवहारांचं उद्दिष्ट गाठायलाही वेळ लागणार नाही.

कोरोना काळात युपीआयची सुरुवात दोन व्यक्तींमध्ये आर्थिक व्यवहार करण्याने झाली. पण, या प्रणालीचा खरा विजय झाला जेव्हा मर्कंटाईल (merchantile) म्हणजे दुकानदाराबरोबरचे व्यवहार युपीआयने करता येऊ लागले. आधी ई-कॉमर्सवर वेबसाईटवर केलेले व्यवहार (स्विगी, झोमॅटो, ओला, उबरचे व्यवहार, ऑनलाईन शॉपिंग इ.) आणि पुढे पुढे अगदी रेल्वे, विमानाचं तिकीट पासून ते कुठलंही बिल भरण्याची सुविधा युपीआयवर मिळायला लागली तेव्हा माणसाच्या दैनंदिन अर्थचक्रातच युपीआयचं महत्त्व वाढलं.

आता युपीआयच्या एकूण व्यवहारांपैकी ६०% व्यवहार हे मर्कंटाईल म्हणजे व्यापारी देवाण घेवाणीसाठी होतात. भारतातील आकडेवारी सांगायची झाली तर देशात ही प्रणाली वापरणारे ३३ कोटी लोक आहेत. ७ कोटी व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे युपीआय व्यवहारांची सोय करून दिली आहे. व्यापाऱ्यांना युपीआय प्रणालीच्या वापरासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागत नाही. आपल्यालाही नाही. त्यामुळे ही प्रणाली सोपी आणि किफायतशीर ठरते आहे. आता बघूया युपीआय प्रणालीचं भारतातील यश आणि जगाने भारतीय युपीआय प्रणालीची घेतलेली दखल.

(हेही वाचा Independence Day 2023 : राष्‍ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक मुंबई अग्निशमन दलातील ५ जवानांना जाहीर)

डेबिट, क्रेडिट कार्डाला टाकलं मागे

युपीआय प्रणालीचा झालेला विकास हा क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डाच्या मात्र मूळावर उठला आहे. खासकरून डेबिट कार्डाचे व्यवहार तर मागच्या वर्षभरात २० टक्क्यांनी कमी झाले आहेत. कारण, कार्डांवर करता येणारे अनेक व्यवहार हळू हळू युपीआयच्या माध्यमातून शक्य झाले आहेत.

पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डाची गरज कमी झाली आहे. कारण, युपीआय व्यवहारांमुळे रोख पैशाची गरज संपली आहे. तर डेबिट कार्ड वापरून खरेदी किंवा पैशाचे व्यवहार करण्याची गरजही आता उरलेली नाही. त्यापैकी बहुतेक व्यवहार युपीआयने होऊ शकतात. क्रेडिट कार्डाचे पैसे लगेचच बँकेतून वळते होत नसल्यामुळे त्यांची गरज अजूनही लोकांना भासते. पण, डेबिट कार्डाची गरज तत्त्वत: संपली आहे.

डेबिट किंवा क्रेडिट कार्डावर मासिक हफ्त्यांमध्ये पैसे देण्याची सोय इतके दिवस होती. तिचा वापरही होत होता. आता युपीआयवरही ही सोय झाल्यामुळे त्यासाठीही डेबिट कार्डाची गरज भासणार नाही. शिवाय महिन्याच्या ठरावीक तारखेला बिल भरायचं असेल किंवा हफ्ता द्यायचा असेल तर तसंही युपीआय प्रणालीला सांगता येतं. म्हणजे तिथेही डेबिट कार्डाची गरज संपली.

अलीकडेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी युपीआय प्लग-इनची घोषणा केली. म्हणजे एखाद्या वेबसाईटवरून तुम्ही पेमेंट गेटवेवर येता तेव्हा मूळ ॲपमधून तुम्हाला बाहेर पडावं लागतं. मग तुम्ही क्रेडिट किंवा डेहिट कार्ज देणाऱ्या बँकेच्या साईटवर येता. आणि मग तुमचा व्यवहार तुम्हाला करता येतो. यात कधी इंटरनेचा वेग कमी असेल किंवा बँकेची साईट नीट चालत नसेल तर व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. असा अनुभव तुम्ही अनेकदा घेतलेला असेल. यालाच पर्याय आहे तो युपीआय प्लग-इन. व्यापाऱ्यांनी ते बसवलं की, तुम्हाला युपीआय पेमेंट्स करण्यासाठी वेबसाईट सोडून जावं लागणार नाही. त्यामुळे युपीआय व्यवहार यशस्वी होण्याचा दरही वाढणार आहे. ॉ

(हेही वाचा Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनानिमित्ताने तिरंगा फडकवण्यात मुसलमानांमध्ये लागली चढाओढ)

आगामी कालावधीत क्रेडिट कार्डाला युपीआयशी जोडण्याचा NPCI चा मानस आहे. शिवाय युपीआय खात्यातच एक वॉलेट तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा वॉलेटमधून कुठल्याही पिन क्रमांकाशिवाय तुम्ही सुटसुटीत व्यवहार करू शकाल. अर्थात, सुरुवातीला छोट्याच रकमेचे व्यवहार यातून करता येतील.

पण, इथं सांगण्याचा मुद्दा हा आहे की, युपीआय बदलतंय. आणि त्याचा अर्थव्यवस्थेतील वापरही बदलतोय. आणि भारतातील या डिजिटल क्रांतीची दखल जग घेतलंय.

भारताची रुपे शक्ती 

युपीआयचा वापर असाच सुरू राहिला आणि तो जगभर पसरला. तर कार्ड पेमेंट्स प्रणालीतील महत्त्वाच्या दोन कंपन्या व्हिसा आणि मास्टर कार्ड यांचाही धंदा कमी होईल. कारण, त्यांच्या मार्फत व्यवहार करण्याची गरजच उरणार नाही.

त्यातही भारताने व्हिसा, मास्टरकार्डला आव्हान देणारी रुपे प्रणाली विकसित केली आहे. आणि सध्या डेबिट कार्डामधील व्यवहारात ती सगळीकडे वापरली जाते. पण, अजून आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपेचा तितका वापर नसल्यामुळे तिचा प्रसार मर्यादित आहे.

पण, केंद्रसरकारने रुपे क्रेडिट कार्डं युपीआयशी जोडल्यानंतर देशातील नवीन क्रेडिट कार्ड खात्यांपैकी २५% खाती रुपेशी जोडलेली आहेत. यातून रुपे या संपूर्ण भारतीय पेमेंट्स प्रणालीचा विकास होणार आहे. आणि भविष्यात युपीआयचा वापर परदेशातील लोक किंवा संस्थेशी करणं सोपं जाणार आहे. ही आहे भारताची रुपे शक्ती. भारतीय लोक यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहराही भारतीय रुपयांमध्ये करू शकतील. आणि या गुणांमुळे भारतातील युपीआय प्रणाली भारताचं वैभव आणि जगासाठी एक केसस्टडी ठरत आहे.

(हेही वाचा Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनानिमित्त 954 पोलिसांना पदके जाहीर; वाचा महाराष्ट्रातील पोलिसांची यादी)

भारताचं वैभव 

देशातील युपीआय प्रणालीची दखल जागतिक वित्तीय संस्थांनी याआधीच घेतली आहे. भारताने आशियाई आणि युरोपीयन देशांमध्ये युपीआय प्रणालीच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी करारही केले आहेत. तिथल्या संस्था युपीआय प्रणालीच्या बांधणीसाठीही भारताची मदत घेत आहेत.

वर म्हटल्याप्रमाणे यात भारताचे दोन महत्त्वाचे फायदे आहेत. NPCI चा प्रयत्न आहे की, परदेशातून भारतात होणारे जास्तीत जास्त व्यवहार युपीआयच्या माध्यमातून व्हावेत. सध्या त्यांनी ठेवलेलं उद्दिष्टं आहे ९० अब्ज अमेरिकन डॉलरचं. आणि दोन देशांमधील व्यापारही युपीआयच्या माध्यमातून व्हावा असा भारताचा प्रयत्न आहे.

यामुळे व्यवहार तर सुटसुटीत होतीलच. पण, युपीआयचा विकास होईल. आणि दोन्ही देशांना अमेरिकन डॉलरवर अवलंबून न राहता स्वकीय चलनात व्यवहार करता येतील. अशा करारसाठी भारताचे अनेक युरोपीयन देशांशी कराराचे प्रयत्न सुरू आहेत. ब्रिक्स देशांमध्येही त्यावर सकारात्मक बोलणी सुरू आहेत.

आणि महत्त्वाचं म्हणजे अशा व्यवहारांचा फायदा दोन्ही देशांसाठी सारखाच असेल. शिवाय आर्थिक व्यवहार झटकन आणि सुरळीत होतील. देशाचा आर्थिक फायदा तर आहेच. शिवाय युपीआय प्रणालीचा विकास ही भारताची स्वत:ला आणि जगाला दिलेली भेट असणार आहे.

भारताने आताच विकसनशील देशांना त्यांच्या त्यांच्या देशात स्थानिक युपीआय प्रणाली विकसित करण्यासाठी मदत देऊ केली आहे. त्यामुळे अशा देशांबरोबर आंतरराष्ट्रीय व्यवहार युपीआयच्या माध्यमातून करणं भारताला तुलनेनं सोपं जाईल.

रशिया – युक्रेन युद्धा दरम्यान रशियन पेमेंट्स प्रणालीने व्हिसा आणि मास्टरकार्ड या अमेरिकन कंपनीचा माध्यम म्हणून वापर बंद केला होता. इतर देशांनीही रशियाला तोडलं होतं. अशावेळी देशाची स्वत:चा पेमेंट्स प्रणाली असणं किती महत्त्वाचं आहे हे जगाला कळलेलं आहे. अशावेळी भारत या क्षेत्रात सुरुवातीपासून आहे. आणि योग्य दिशेनं वाटचालही करत आहे.

(हेही वाचा Independence Day ceremony : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यदिन सोहळा; महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी करणार पथ संचलन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.