
-
प्रतिनिधी
“जनतेला स्वस्त दरात वीज आणि राज्याला हरित ऊर्जेची क्रांती यासाठी प्रत्येक ऊर्जा प्रकल्प वेळीच पूर्ण करा,” असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी ऊर्जा विभागाला दिला. सह्याद्री अतिथीगृहात ऊर्जा विभागाच्या योजनांचा आढावा घेताना मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे (दूरदृश्यप्रणालीद्वारे), राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, ओ. पी. गुप्ता, राजगोपाल देवरा, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
“मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०” डिसेंबर २०२५ पूर्वी पूर्ण करा!
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विशेषतः मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यांनी पीएम सूर्यघर योजनेतून शासकीय इमारतींचे सौर विद्युतीकरण, मॉडेल सोलर व्हिलेज योजना, आणि हायड्रोजन परिसंस्थेच्या विकासासाठी संशोधन व कौशल्य विकास प्रकल्प राबवण्यावरही भर दिला.
(हेही वाचा – Ahmedabad Plane Crash : टीम इंडियाचे खेळाडू काळी फित बांधून उतरले मैदानावर)
वीज प्रकल्पांना गती मिळावी यासाठी ‘गती शक्ती’ पद्धतीचा अवलंब करा
महावितरण, महापारेषण व महाउर्जा यांच्या सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी गती शक्तीच्या धर्तीवर व्हावी, असे निर्देश देत “वीज गळती रोखा आणि जनजागृती वाढवा,” असा संदेशही त्यांनी दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून थकीत वीजबिल वसूल करण्यासाठी स्वतंत्र योजना आखावी, तसेच उर्जा वितरण यंत्रणा भविष्यातील वाढत्या मागणीसाठी सक्षम करण्याचा रोडमॅप तयार करण्याचेही आदेश देण्यात आले.
हरित ऊर्जा : महाराष्ट्राची नवी ओळख!
“ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र देशाला दिशा देईल, यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने मिशन मोडमध्ये काम करा,” असे आवाहन करत मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी हरित ऊर्जा विकासालाच पुढील दशकातील “गेम चेंजर” म्हणून घोषित केले. एकात्मिक नियोजन, कालबद्ध अंमलबजावणी आणि दूरदृष्टी – अशा त्रिसूत्रीवर उभारले जाणारे हे ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहेत!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community