धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या ULLAS मोबाईल अॅपचे उद्घाटन

वापर करण्यासाठी आणि परस्पर संवादासाठी सोपे असलेले हे अॅप, अॅन्ड्रॉईड आणि आय ओ एस, दोन्हीवर उपलब्ध आहे

437
धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या ULLAS मोबाईल अॅपचे उद्घाटन

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) च्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त, ULLAS (अंडरस्टँडिंग लाइफलाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी) या मोबाईल अॅप्लिकेशनचे उद्घाटन करण्यात आले.

केंद्रीय शिक्षण मंत्री आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री, धर्मेंद्र प्रधान यांनी बोधचिन्ह, जन जन साक्षर हे घोषवाक्य आणि नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या ULLAS (अंडरस्टँडिंग लाइफलाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी) या मोबाईल अॅप्लिकेशनचे उद्घाटन केले.

मूलभूत साक्षरता प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा उपयोग करण्यात, ULLAS मोबाईल अॅप्लिकेशन हा एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड असल्याचे प्रधान यांनी सांगितले. वापर करण्यासाठी आणि परस्पर संवादासाठी सोपे असलेले हे अॅप, अॅन्ड्रॉईड आणि आय ओ एस, दोन्हीवर उपलब्ध आहे आणि एनसीइआरटीच्या दिक्षा पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या विविध प्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी डिजिटल प्रवेशद्वार म्हणून काम करेल, असेही प्रधान यांनी सांगितले.

स्वयं-नोंदणीद्वारे किंवा सर्वेक्षणकर्त्यांद्वारे, विद्यार्थी आणि स्वयंसेवकांच्या नोंदणीसाठी ULLAS अॅपचा वापर केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले. कार्यात्मक साक्षरता, व्यावसायिक कौशल्ये आणि आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आणि राष्ट्र उभारणीत सहभागी होण्यासाठी नागरिकांचे सक्षमीकरण यासारख्या अनेक महत्त्वाच्या जीवन कौशल्यांना चालना देण्यावर, ULLAS अॅप लक्ष केंद्रित करेल, असे मंत्र्यांनी अधोरेखित केले. हे अॅप सतत शिकण्याची आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे काम करेल.

(हेही वाचा – व्यंकटेश प्रसादने उपटले टीम इंडियाचे कान, म्हणाले पैसा अन् पॉवर आहे मात्र…)

ULLAS (अंडरस्टँडिंग लाइफलाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी) म्हणजेच समाजातील सर्वांसाठी, अध्ययन आजीवन समजून घेण्याचा उपक्रम, देशभरात शिक्षण आणि साक्षरतेमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणारी अध्ययन परिसंस्था वाढवून, तसेच महत्वाच्या जीवनकौशल्य प्राप्तीसाठी मूलभूत साक्षरता निर्माण करून, हे अॅप या बाबी साध्य करु शकेल. शाळेत जाण्याची संधी न मिळालेल्या 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना हे अॅप, प्राथमिक शिक्षण, डिजिटल आणि आर्थिक साक्षरता, तसेच महत्वाची जीवन कौशल्ये देऊ करते. स्वयंसेवेच्या माध्यमातून याची अंमलबजावणी होत आहे.

नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य, तसेच ” ULLAS: नव भारत साक्षरता कार्यक्रम”, या एकंदर मोहिमेचा उत्साह आणि जोम दर्शवतात. हे सर्व देशाच्या कानाकोपऱ्यात पसरणाऱ्या ज्ञानाच्या प्रकाशाचे प्रतीक आहे, हे नागरिकांना शिक्षणाच्या सामर्थ्याने सशक्त बनवते आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये कुतूहलाची ज्योत प्रज्वलित करते आणि जन जन साक्षर बनवते.

ही योजना, स्वयंसेवकांना राष्ट्र उभारणीसाठी कर्तव्य किंवा कर्तव्य बोध म्हणून योजनेत भाग घेण्यास प्रवृत्त करेल आणि विद्यार्थी स्वयंसेवकांना शाळा/विद्यापीठातील प्रमाणपत्रे, प्रशंसापत्रे, सत्कार, अशा माध्यमांद्वारे श्रेय आणि प्रोत्साहन देईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.