-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी मूर्तीवरील बंदी उठवण्याचा सोमवारी महत्त्वाचा आदेश दिला. न्यायालयाने गणेश मूर्तीचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्त्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. जलप्रदूषण रोखण्याच्यादृष्टीने ही अट महत्त्वपूर्ण असली तरी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या उंच मूर्तीचे विर्सजन कसे करणार असा सवाल उपस्थित करत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने चिंता व्यक्त केली आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीच्या विसर्जनासंदर्भात फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना, मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी मूर्तीवरील बंदी उठवण्याचा महत्त्वाचा आदेश दिला. या आदेशाचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती स्वागत करते, असे म्हटले आहे. (Murti Visarjan)
पीओपी गणेशमूर्तीसंदर्भात मागील चार वर्षांपासून समन्वय समितीने सातत्याने पाठपुरावा केला आणि याबाबत न्यायालयाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी आणि शर्थीच्या अधीन राहून उत्सव कसा आनंदाने साजरा होईल, यासाठी कसोशिने प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांना यश मिळाले. पण न्यायालयाने गणेश मूर्तीचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्त्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीचे कृत्रिम जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्याबाबत एका समितीची स्थापना करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. जलप्रदूषण रोखण्याच्यादृष्टीने ही अट महत्त्वपूर्ण आहे. मात्र सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या उंच मूर्तीचे विर्सजन कसे करणार, याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीलाही चिंता वाटत असल्याचे अॅड. दहिबावकर यांनी नमुद केले. (Murti Visarjan)
(हेही वाचा – Mumbai Train Accident : गेल्या २० वर्षात रेल्वे अपघातात ५१ हजार ८०२ जणांनी प्राण गमावले)
पीओपी मूर्तीवरील बंदी उठवणे हा घरगुती गणेश भक्तांसाठी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आनंदाचीच बाब आहे. त्याबद्दल न्यायालयाचे आणि कोर्टात योग्य प्रकारे बाजू मांडणाऱ्या राज्य सरकारचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती अभिनंदन करते. गणेशोत्सवात श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मूर्तीचे विर्सजन या दोन्ही विधींना प्रचंड महत्व आहे. श्रींचे आगमन आणि विसर्जन हे मोठ्या भक्तीभावात आणि वाजतगाजत केले जाते. मागील अनेक वर्षांपासून मुंबईत कृत्रिम तलावांमध्ये घरगुती मूर्तीचे विसर्जन केले जात आहे. या संदर्भात जनजागृती वाढत असून एक सकारात्मक परिवर्तन दिसून आले आहे. (Murti Visarjan)
मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या उंच मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन व्यवस्था करणे हे मंडळांबरोबच प्रशासनासाठी देखील तितकेच आव्हानात्मक असल्याचे सांगत अॅड. दहिबावकर यांनी सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीची उंची पाहता मोठे कृत्रिम तलाव उभारणे इतक्या कमी वेळेत पालिका आणि इतर प्रशासकीय यंत्रणांना शक्य आहे का असाही सवाल उपस्थित केला आहे. भव्य कृत्रिम तलावांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात पुरेशी मोकळी जागा किंवा मैदाने आहेत का? हेही पहावे अशी सूचना त्यांनी केली आहे. (Murti Visarjan)
(हेही वाचा – Suicide Case : धक्कादायक! ६२ वर्षीय पतीने पत्नीसह स्वतःवर गोळी झाडत केली आत्महत्या)
सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघतात, यात लाखोंच्या संख्येने गणेशभक्त सहभागी होतात. समुद्रावर प्रचंड जन समुदायाचे नियोजन करता येते मात्र कृत्रिम तलावांच्या ठिकाणी मर्यादित जागेमध्ये या प्रचंड गर्दीचे कशा प्रकारे नियोजन करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे समुद्रात विसर्जन होताना मूर्तीसोबत मोजकेच लोक प्रत्यक्ष आतमध्ये जातात. इतर लोक आपसूकच किनाऱ्यावर थांबतात. सरसकट कोणीही थेट समुद्रात जात नाही. मात्र कृत्रिम तलावांशेजारी विसर्जनावेळी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी चेंगराचेंगरी होऊ नये, याची खबरदारी प्रशासनाला घ्यावी लागेल. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीच्या विसर्जनासंदर्भात राज्य सरकारने फेरविचार करावा, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीला वाटते, असेही अॅड. दहिबावकर यांनी स्पष्ट केले. (Murti Visarjan)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=HGbEIWiNnSg&t=1s
Join Our WhatsApp Community