-
प्रतिनिधी
भारताच्या इतिहासातील अजरामर महिला शासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या जन्मस्थळाच्या भव्य विकास आराखड्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने 681 कोटी 32 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. बुधवारी नियोजन विभागाकडून यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची संपूर्ण अंमलबजावणी अहिल्यानगर (जामखेड) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पाहणार आहेत.
चौंडी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे (Ahilyadevi Holkar) जन्मगाव. त्यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त 6 मे 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक बैठक चौंडी येथे पार पडली होती. त्या बैठकीत या स्मृतीस्थळाच्या संवर्धनासाठी भव्य आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. अवघ्या दोन आठवड्यांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने त्याची प्रशासकीय मंजुरी देऊन विकास प्रक्रियेला गती दिली आहे. उपमुख्यमंत्री पवार हे गेल्या अनेक महिन्यांपासून यासाठी सातत्याने बैठका घेत होते. चौंडीसारख्या ऐतिहासिक स्थळाला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केलेल्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्थळांच्या विकास योजनेत चौंडीचा समावेश केला गेला.
(हेही वाचा – वीर सावरकरांचा त्याग राष्ट्रासाठी प्रेरणादायक; Amit Shah यांची एक्सवर भावूक पोस्ट)
या भव्य विकास आराखड्यात :
- ऐतिहासिक वास्तूंचे मूळ स्वरूप जपण्यावर भर दिला जाणार आहे.
- पुरातत्त्वीय जाण असलेल्या तज्ज्ञ संस्थांकडूनच कामे केली जाणार.
- केंद्र शासनाच्या PRASAD किंवा स्वदेश दर्शन योजनेतील निधीद्वारे काही कामे पूर्ण केली जाणार आहेत.
(हेही वाचा – Amit Shah यांचे वीर सावरकर जयंतीनिमित्त अभिवादन; म्हणाले…)
प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सर्व संबंधित तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करून आराखडा तयार केला. हा आराखडा राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजूर केला होता. संपूर्ण विकास आराखड्यातील कामे 31 मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या (Ahilyadevi Holkar) स्मृतीस्थळाचा हा विकास म्हणजे केवळ भौतिक पुनर्रचना नसून, इतिहास, संस्कृती आणि अभिमानाचे नवसंवर्धन ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सक्रिय पाठपुराव्यामुळे हा निर्णय आज प्रत्यक्षात उतरला आहे, अशी सर्वत्र प्रशंसा होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community