Hindu Rashtra : हिंदूंनो, ‘हलाल’सारख्या इस्लामी आर्थिक आक्रमणाला बहिष्काराने प्रत्युत्तर द्यावे;  रणजित सावरकरांचे आवाहन 

‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या उद्घोषात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा'ला उत्साही वातावरणात प्रारंभ!

148

पूर्वीची लढाई ही तलवारीच्या बळावर होत होती, आताची लढाई आर्थिक स्तरावर चालू आहे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्र, व्यवसाय मुसलमान ताब्यात घेत आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रत्येक हिंदूंनी मुसलमान व्यापाऱ्यांवर बहिष्कार घालून हिंदू व्यापाऱ्यांसोबतच व्यवसाय करेन. हिंदूंचा व्यवसाय हिंदूंसोबतच झाला पाहिजे, असा निश्चय केला पाहिजे. अशा प्रकारे हिंदूंनी आपली आर्थिक शक्ती वाढवून इस्लामी आर्थिक आक्रमणाला प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केले.

ranjit savarkar 1

‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या अर्थात् एकादश ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या उद्घाटनप्रसंगी रणजित सावरकर बोलत होते. या अधिवेशनात देशविदेशांतून, तसेच भारतातील विविध राज्यांतील 312 हून अधिक हिंदू संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वीर सावरकर यांच्या विचारांनी कार्य करावे

सद्यस्थितीत हिंदू 80 टक्के आहोत; मात्र जात, पात, प्रांत यात विभागले गेले आहेत. वर्ष 1790 मध्ये या भारतात हिंदूंची संख्या जवळपास 100 टक्के होती. महंमद बीन कासीमचे आक्रमण झाले आणि त्याने हिदूंमधील फुटीचा उपयोग करून हिंदू राजा दाहीरचा पराभव केला. हिंदू संघटित नाहीत, हे आपल्या पराभवाचे प्रमुख कारण असून नौखालीत ज्याप्रमाणे हिंदूंचे हत्याकांड झाले, त्याप्रमाणेच आजही बांगलादेशातही हिंदूंचे शिरकाण होत आहे. भारतात जेव्हा खिलाफत चळवळ झाली, त्याला मोहनदास करमचंद गांधी यांनी पाठिंबा दिला होता. या चळवळीचा भारतातील मुसलमानांचा काहीही संबंध नव्हता, तरीही मुसलमानांनी त्याचा संधी म्हणून उपयोग केला आणि भारतात दंगली घडवून येथील हिंदूंची शिरकाण केले. हिंदू महिलांवर अत्याचार केले. धर्मांध मुसलमानांनी मृत आणि अर्धमेल्या अवस्थेतील हिंदूंनी विहिरी खचाखच भरल्या होत्या. त्याच वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ लिहिला आणि हिंदू धर्माची व्याख्या केली. सिंधू नदीपासून सिंधू सागरपर्यंत जो जो या भूमीला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू. या व्याख्येनुसार मुसलमान आणि ख्रिस्ती वगळता सर्व हिंदू होतात. या विचाराने आपण सर्व हिंदू संघटित होणे आवश्यक आहे. शिखांचे धर्मगुरु गुरुगोविंदसिंह यांनी स्वत:चा पंथ ‘खालसा’ असल्याचे म्हटले; परंतु धर्म ‘हिंदु’ असल्याचे सांगितले होते. सनातन हिंदु धर्म हाच आपला धर्म आहे. ‘हिंदुत्व हेच आपले राष्ट्रीयत्व आहे’, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आपण समजून घ्यायला हवेत, असेही रणजित सावरकर म्हणाले.

hindu rashtra

(हेही वाचा Veer Savarkar : कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारचा हिंदुद्वेष; सत्तेत येताच वीर सावरकरांवरील धडा अभ्यासक्रमातून वगळला )

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’तून हिंदु शक्ती हिंदु राष्ट्र निर्माणासाठी जोडली जाईल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

खालिस्तानचा आतंकवाद, श्रीरामनवमी-हनुमानजयंती अशा सणांना दंगलींचे वाढलेले प्रमाण, समलिंगी विवाहाचे समर्थन,‘लिव्ह इन रिलेशनशीप’च्या व्यभिचाराला मान्यता, अश्लीलतेचे वाढते प्रस्थ, अनैतिकतेला संवैधानिक करण्याचे प्रयत्न यांसह अनेक आव्हाने सध्या हिंदूंसमोर आहेत. या सर्व समस्यांवर ‘सेक्युलर’ राज्यव्यवस्थेत कोणतेही उत्तर नसून शाश्वत हिंदु राष्ट्र हेच त्यावर उत्तर आहे. सनातन धर्मदर्शनात हिंदु विश्वाचा, म्हणजेच वैश्विक हिंदु राष्ट्राचा विचार आहे. त्यामुळे हा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ म्हणजे एक प्रकारचे लोकमंथन आहे. या लोकमंथनातून एकत्रित आलेली ही हिंदु शक्ती ही हिंदु राष्ट्र निर्माणाच्या विश्व कल्याणकारी कार्यासाठी जोडली जाणार आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी या प्रसंगी केले.

ग्रंथांचे प्रकाशन !

या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण’ (खंड १) : साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’, या हिंदी आणि मराठी या ग्रंथाचे भागवताचार्य श्री राजीवकृष्णजी महाराज झा, पू. भागिरथी महाराज, पू. रामज्ञानीदास महात्यागी महाराज, अधिवक्ता पू. हरिशंकर जैन, महंत दीपक गोस्वामी यांच्या हस्ते, तर ठाणे (महाराष्ट्र) येथील दुर्गेश परुळकर यांच्या ‘महाभारतातील अलौलिक चरित्रे : खंड १, निष्काम कर्मयोगी भीष्म’ या ग्रंथाचे दुर्गेश परुळकर, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, केरलीय क्षेत्र परिपालन समितीचे आचार्य पी.पी. एम्. नायर, प.पू. यतीमाँ चेतनानंद सरस्वती यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. अधिवेशनाचा प्रारंभ शंखनादाने आणि मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. दीपप्रज्वलन नंतर वेदमंत्रांचे पठण झाले. या प्रसंगी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.

या प्रसंगी श्रृंगेरी येथील दक्षिणम्नाय श्री शारदा पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री भारती तीर्थ महाराज यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री विधुशेखर भारती महाराज यांनी दिलेला आशीर्वादरूपी संदेशाचा ‘व्हिडिओ’ दाखवण्यात आला. ‘धर्मावरील श्रद्धा वाढवण्यासाठी आणि धर्माचे आचरण होऊन धर्माचे रक्षण होण्यासाठी अशा अधिवेशनांची अतिशय आवश्यकता आहे.’, असे त्यांनी या संदेशात नमूद केले आहे. याचसमवेत कर्नाटक येथील पेजावर मठाचे श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांनी दिलेल्या संदेशाचेही वाचन करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.