“ग्रामोफोन-कॅसेटच्या जमान्यातली मराठी भावगीते आणि भक्तीगीतं ही आजही मराठी मनावर राज्य करणारी ठरतात – त्यांना आधुनिक रेडिओवरही स्थान हवं!” अशी ठाम भूमिका सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मांडत, खाजगी रेडिओ स्टेशन्सना (Radio Stations) ही गाणी नियमितपणे प्रसारित करण्याचा सल्ला दिला.
मंत्रालयात आयोजित विशेष संवाद बैठकीत शेलार यांनी रेड एफएफ, रेडिओ सिटी ९१.१ यांच्यासह खाजगी एफएम क्षेत्रातील आरजे आणि प्रतिनिधींशी सखोल संवाद साधला. भाजपा पदाधिकारी हेनल मेहता (Henal Mehta) यांच्या पुढाकारातून ही बैठक पार पडली.
(हेही वाचा – दाऊदचा हस्तक फैसल शेख चालवायचा आर्थर रोड जेलमधून Drugsची टोळी , त्याची रवानगी आता चेन्नई तुरुंगात)
“रेडिओवर मराठीची ठसठशीत छाप पाहिजे!”
शेलार म्हणाले,”आमचं बालपण आकाशवाणीवर लागणाऱ्या गाण्यांनी घडवलं. ‘घड्याळावर साडेसात’ म्हणजे भावगीतांचा सुवर्णक्षण, आणि ‘सकाळी सत्यनारायणाची पूजा’ म्हणजे प्रल्हाद शिंदेंचं (Prahlad Shinde) गाणं – ही मराठी भावविश्वाची ओळख आहे. म्हणून आजच्या नव्या रेडिओ जमान्यातही ही परंपरा सुरू ठेवायला हवी.”
ग्रामीण-शहरी रसिकांचं समान नातं
ते पुढे म्हणाले,”आजही गावकऱ्यांपासून शहरी रसिकांपर्यंत सर्वजण भाव-भक्तीगीतांशी गाढ नातं जपतात. म्हणून रेडिओ स्टेशनवरून ‘त्या’ जुन्या पण अजोड गीतांचा पुनर्प्रसार झालाच पाहिजे. हे केलंत तर महाराष्ट्र तुम्हाला नक्की दाद देईल!”
रेडिओ उद्योगाच्या अडचणींवरही चर्चा
या बैठकीत फक्त भावना नव्हे, तर रेडिओ क्षेत्रातील तांत्रिक, आर्थिक अडचणी, कंटेंट धोरण, स्थानिक कलाकारांना संधी, मराठी संगीतासाठी व्यासपीठ या मुद्द्यांवरही चर्चा झाली. सरकार आणि रेडिओ क्षेत्र यांच्यात नवा समन्वय निर्माण करण्याची तयारी शेलार यांनी दर्शवली. “भावगीतं-भक्तीगीतं म्हणजे मराठी संस्कृतीची नाळ – ती जपायची जबाबदारी आता रेडिओवरसुद्धा आहे!” अशी मंत्री शेलार (Ashish Shelar) यांची साद रेडिओ उद्योगाला बदल घडवण्यास भाग पाडते का, हे लवकरच दिसेल!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community