…तर आता कांदा आणि टोमॅटो महागणार

94

मंदौस चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्यात पोहोचलेल्या बाष्पाने राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांत अवकाळी पावसाचा मारा केला. परिणामी, विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरी आणि हरभ-याच्या पिकांना नुकसान पोहोचल्याची भीती कृषी अभ्यासक गजानन जाधव यांनी व्यक्त केली. बुधवारी नाशिक येथेही पाऊस झाल्याने भाजीपाला आणि द्राक्षपिकांचेही नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कांदा आणि टोमॅटोच्या पिकांचे नुकसान फारसे नसले तरीही कृत्रिम टंचाई केल्यास येत्या दिवसांत कांदा-टोमॅटोच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रविवारपासून राज्यात पावसाचे शिडकावे सुरु होते. मंगळवारी आणि बुधवारी दक्षिण मराठवाड्यात बहुतांश भागांत पाऊस झाला. लातूर, बीड, सोलापूर या भागांत पावसाने हजेरी लावली. या भागांत अंदाजे १० मिलीमीटर पाऊस झाला. नागपूर, वर्धा, नांदेड, वाशिम तसेच मालेगाव येथेही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे धुके येतात आणि त्यामुळे पिके गळून पडतात. टोमॅटोला दमट आणि ढगाळ वातावरण आवश्यक असते. आता टोमॅटोच्या लागवडीला सुरुवात होत आहे. परंतु मोठ्या प्रमाणात लागवडीला सुरुवात झाली नसल्यानेे तसेच पावसाचा फारसा जोर नसल्याने नुकसान झाले नसल्याची माहिती स्थानिक शेतक-यांनी दिली. आता पावसाचे वातावरण निवळत असल्याने राज्यात पुन्हा कोरडे वारे वाहू लागतील. आठवड्याच्या शेवटी पुन्हा थंडीसाठी पोषक वातावरण तयार होत नसल्याने पावसाची पुन्हा शक्यता नसल्याची माहिती वेधशाळेच्या अधिका-यांनी दिली.

( हेही वाचा: INS Vikrant च्या नावाखाली अपहार केल्याच्या आरोपाप्रकरणी किरीट सोमय्यांना क्लिनचीट )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.