Ahmedabad Plane Crash नंतर मुंबई आणि नवी मुंबई Airport नजीक मांस विक्री करणाऱ्या दुकानांवर बंदीची मागणी

73

अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातानंतर मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी (Airport) आवश्यक असणाऱ्या खबरदारीचे मुद्दे अधोरेखित केले जात आहेत. विमानतळाच्या परिसरात उघड्यावर होणाऱ्या मटण-चिकन विक्रीच्या मुद्द्याकडे पर्यावरणप्रेमींनी पुन्हा लक्ष वेधले आहे. मांसाच्या तुकड्यांसाठी येथे पक्ष्यांचा वावर असून, ते विमानांना धडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मांसविक्रीची दुकाने बंद केली जावी, या मागणीने पुन्हा जोर धरला आहे.

10 किमीच्या परिघात कत्तलीस बंदी 

मुंबई विमानतळाच्या (Airport) शेजारी मोठ्या प्रमाणात झोडपडपट्टी आहे, तिथे मांसविक्रेते आहेत. नवी मुंबई विमानतळही लवकरच कार्यान्वित होणार आहे. विमान कंपन्यांनी विमानतळ ऑपरेटरशी करार केले आहेत. याआधीच्या अनेकदा मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेली मांस विक्रीची दुकाने बंद करण्यासाठी प्रयत्न झाले पण त्याला यश येऊ शकले नाही. आता नवी मुंबई विमानतळही (Airport) सुरु होणार आहे. त्यामुळे तेथील मांस विक्रीची दुकाने बंद व्हावीत अशी मागणी होऊ लागली आहे. सिडकोच्या अध्यक्षतेखाली एअरोड्रोम पर्यावरण देखरेख समिती नियुक्त करणाऱ्या महाराष्ट्र सरकारने आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की विमानतळापासून 10 किमीच्या परिघात कत्तल करण्यास मनाई आहे. असे असतानाही उलवे परिसरात उघड्यावर होणाऱ्या कोंबड्या, बकरे यांच्या कत्तलीबाबत आणि विक्रीबाबत प्रशासनाने काहीच भूमिका घेतली नसल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. उलवे हा भाग सिडकोकडे आहे आणि तरीही त्यांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. अहमदाबादला झालेल्या अपघातानंतर या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा Maval मध्ये जुना पूल कोसळला; २० हून अधिक वाहून गेल्याची भीती)

कत्तलीचा मुद्दा गायब

भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) द्वारे व्यवस्थापित एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन सर्व्हिस (एआयएस) ने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Airport) परिचालनाच्या तयारीशी संबंधित नोटिस टू एअरमन – यादी जारी केली आहे. परंतु, उलवेतील तीन किमीच्या परिघात बेकायदेशीर कत्तलीशी संबंधित मुद्दा या यादीतून गायब आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले आहे. उघड्यावरील मांसाकडे आकर्षित होऊन पक्षी येथे येऊ नयेत आणि पक्ष्यांची धडक विमानाला बसू नये यासाठी ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. विमानांच्या उड्डाणांत अडथळा ठरणाऱ्या घटकांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा, असे नॅटकनेक्ट फाऊंडेशनने पर्यावरण विभागाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींनी पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली आहे. शिवाय डिजीसीएकडेही तक्रार केली आहे.

कोणतीच कार्यवाही नाही

नॅटकनेक्टच्या मागील तक्रारीवर डीजीसीएचे संचालक अमित गुप्ता यांनी, पक्ष्यांना आकर्षित करू शकणाऱ्या कत्तलीविरुद्ध कारवाई करण्याचा सल्ला एअरोड्रोम ऑपरेटरला दिला आहे. परंतु प्राण्यांची बेकायदेशीर कत्तल, मटण आणि कोंबडीच्या मांसाच्या खुल्या विक्रीविरोधात कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. याबाबत सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही यावर अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. मात्र अहमदाबादच्या अपघातानंतर तरी याबाबत काही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.