क्रांतीचे अग्रदूत भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Veer Savarkar) दैवत आणि प्रेरणास्थान ! वीर सावरकरांनी रचलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीत म्हटले आहे की, ‘साधू परित्राणाया, दुष्कृति नाशाया भगवन् भगवदगीता सार्थ कराया या’, म्हणजे संत-सज्जनांच्या संरक्षणाकरता आणि दैत्यांच्या नाशाकरता परमेश्वर अवतार घेतो, हे गीतेतील वचन सार्थ करण्यासाठी हे शिवराय तुम्ही या, असे वीर सावरकरांनी म्हटले आहे. भगवद्गीतेत सांगितलेला कर्मयोग नागरिक म्हणून आपण आचरणात आणला पाहिजे. राष्ट्रधर्म पाळला पाहिजे. शासन आणि सेना दले त्यांचे काम करत आहेत. आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. आपण नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पूर्ण केली पाहिजेत. सावरकरांनी असे म्हटले आहे की, भगवान श्रीकृष्णाचे (Lord Krishna) अनन्यसाधारण कृत्य म्हणजे कंसवध म्हणजे दुष्टवध ! त्यानुसार आपण शत्रूचा वध करणे गरजेचे आहे. भगवान श्रीकृष्ण आणि वीर सावरकर यांनी सांगितलेल्या विचारांवर देशाने चालणे गरजेचे आहे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी केले. त्या पुणे येथे संपन्न झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेत बोलत होत्या.
(हेही वाचा – Maharashtra Government : ‘डिजिटल पुश’ अंतर्गत शिस्तभंगाची सूचना पाठविण्यात येणार; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय)
पुणे (Pune) येथील गीताधर्म मंडळाची स्थापना वर्ष १९२४ मध्ये स्थापना झाली. त्याला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या औचित्याने २८ मे या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विविध पैलूंवर व्याख्यानमाला संपन्न झाली. सोमवार, २६ मे ते शनिवार ३१ मे २०२५ या कालावधीत ६ दिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
मंजिरी मराठे पुढे म्हणाल्या की, वीर सावरकरांनी मार्से बंदरात मोरिया बोटीतून उडी मारून पोहत किनारा गाठत ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना बेड्यांत जखडून पुन्हा बोटीवर आणण्यात आले. त्या वेळी त्यांनी केलेल्या ‘आत्मबल’ या कवितेतूनच त्यांना पुढील छळाला पुरून उरण्यासाठीचा कवचमंत्र मिळाला. त्यात भगवदगीतेतील अमरत्वाचे तत्त्वज्ञान उफाळून आले आणि सावरकरांनी लिहिले, ‘अनादि मी अनंत मी अथांग मी भला’ ! वीर सावरकरांची प्रेरणा आणि लढाऊ वृत्ती यांची आज देशाला आवश्यकता आहे.
या वेळी मंजिरी मराठे यांनी ‘हिंदू ते हिंदू’ अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या ‘ओम प्रमाणपत्रा’विषयीही उपस्थितांना अवगत केले. सर्व हिंदूंनी ‘ओम प्रमाणित ग्राहक’ होण्यासह आपले उद्योग-व्यवसाय यांच्यासाठी ‘ओम प्रमाणपत्र’ घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
या व्याख्यानमालेमध्ये डॉ शरद कुंटे यांनी ‘सद्यस्थिती आणि स्वा. सावरकर’ (Veer Savarkar) या विषयावर, सौ. सुजाता बापट यांनी ‘स्वा. सावरकरांची काव्यसृष्टी’ या विषयावर, प्रा. वेदांत कुलकर्णी यांनी ‘स्वा. सावरकरांच्या नाटकांचा संदेश’ या विषयावर, विवेक गोसावी यांनी ‘अंदमानातील सावरकर’ या विषयावर, सागर कुलकर्णी यांनी ‘स्थितप्रज्ञ सावरकर’ या विषयावर, तर मंजिरी मराठे यांनी समारोपीय भाषण केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community