स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या दुर्दम्य उर्मीचा प्रेरणास्रोत म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर ! स्वातंत्र्याचा वैश्विक उद्गाता म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर ! (Veer Savarkar) सध्याच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेल्या सैनिकीकरणाच्या पैलूची देशाला नितांत आवश्यकता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकटे असे होते जे त्या वेळी म्हणत होते की, जर भारतीय तरुणांना संधी मिळाली, तर त्यांनी ब्रिटिशांच्या सैन्यात भरती व्हावे. शस्त्राचे तोंड कुठे करायचे, हे आपल्याला ठरवता येते. त्यांच्या प्रेरणेने अनेक हिंदू सैन्यात भरती झाले. कराराच्या कागदांची कधीही तमा बाळगायची नसते; कारण कराराचे कागद हे एका बाजूने कायम कोरेच असतात, त्या कोऱ्या बाजूवर आपल्याला इष्ट ते लिहिता येते. फक्त ते लिहिण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असायला हवे. स्वातंत्र्य कागदाच्या भाऱ्यांनी कधीही मिळत नाही, ते तोफांच्या माऱ्यानेच मिळू शकते, हा विचारही सावरकरांनीच मांडला होता. सैनिकीकरणासाठी जे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, त्यासाठी आत्ताच्या माध्यमिक विद्यालयांनी पुढे येणे आवश्यक आहे. अनेक सामाजिक संस्थांनी दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवायला हवा. तिथेही अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. वीर सावरकरांच्या विचारांचे अनुसरण करून संस्कृतीच्या रक्षणासाठी आता राष्ट्रनिष्ठाच इतक्या कडव्या आणि जाज्वल्य व्हायला हव्या की, दहशतवाद्यांना राष्ट्रनिष्ठांचीच भीती वाटायला हवी, असे आवाहन प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते मयुर भावे यांनी केले.
(हेही वाचा –तरुणाईला Veer Savarkar उमगायला लागले की, हिंदु राष्ट्र निर्माण होईल; गीता उपासनी यांनी व्यक्त केला विश्वास )
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या वेळी मयुर भावे बोलत होते. पुण्यातील (Pune) भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिहासाचार्य राजवाडे सभागृहात हा कार्यक्रम रविवार, १ जून या दिवशी संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्यात्या गीता उपासनी यांनीही ओघवत्या शैलीत आपले विचार मांडले. वीर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
असा संपन्न झाला सोहळा
कार्यक्रमाच्या आरंभी श्रीनिवास शिंदगी यांनी लिहिलेली वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली सावरकरांची आरती विभा हरिश्चंद्रकर, सानिका फडके आणि श्रीरंग जोशी यांनी अतिशय प्रभावीपणे सादर केली. आशिष जोशी यांनी त्याच्या खास शैलीत सगळ्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीरंग जोशी यांनी ‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला’ हे गीत सादर केले. या गीताचे संगीत दिग्दर्शन वर्षा भावे यांनी आणि संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले आहे. भक्ती पागे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने पुण्यात प्रथमच सावरकर जयंतीनिमित्त झालेल्या या कार्यक्रमा मागची भूमिका कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी विशद केली आणि प्रत्येक वर्षी पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असेही जाहीर केले.
मायदेश फाऊंडेशनचे अरुण जोशी, इतिहास संशोधक पांडुरंग बळकवडे, ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. स्मारकाचे पदाधिकारी राजेंद्र वराडकर, स्वप्नील सावरकर, शैलेंद्र चिखलकर, संतोष कारकर, सौरभ धडफळे, प्रांजल अक्कलकोटकर हेही या वेळी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community