
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरात उड्डाणपुलांची कामे प्रगतिपथावर आहेत. पावसाळ्यापूर्वी पुलांच्या कामांना गती द्यावी. रेल्वे प्रशासनासमवेत समन्वय साधून सुयोग्य नियोजन करावे. दिलेल्या मुदतीत पुलांची कामे पूर्ण होतील, यासाठी दक्षता बाळगावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत बेलासिस पूल, १० जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल आणि ३१ मे २०२६ पर्यंत शीव (सायन) उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले झाले पाहिजेत, अशी कालमर्यादा बांगर यांनी निश्चित केली. (BMC)
महानगरपालिकेच्यावतीने रेल्वे मार्गांवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. त्यात प्रामुख्याने बेलासिस, कर्नाक आणि शीव उड्डाणपुलांचा समावेश आहे. या पुलांच्या कामांचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी २३ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. पोलीस सह आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, रेल्वे विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. (BMC)
(हेही वाचा – Congress नेत्याकडून दिशाभूल; Pahalgam हल्ल्यात मृत झालेल्या २६ पैकी १४ मुस्लिम!)
जून महिन्यात महानगरपालिकेच्या ताब्यात
शीव उड्डाणपूल ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. शीव पश्चिम बाजूस ‘बेस्ट’वाहिन्यांचे स्थलांतरणाची कार्यवाही २७ एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होईल. झाडांच्या फांद्या छाटण्याची परवानगी महानगरपालिकेच्यावतीने देण्यात येईल. रेल्वे विभागामार्फत पादचारी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो जून महिन्यात महानगरपालिकेच्या ताब्यात येईल. त्यानंतर रेल्वे विभाग हद्दीतील पुलाचे उर्वरित पाडकाम करण्यात येईल, असे अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले. (BMC)
रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सुसमन्वय
भुयारी मार्गासाठी रेल्वे विभागामार्फत ऑगस्ट २०२५ मध्ये जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, पावसाळ्याच्या कालावधीत काम सुरू करता येणार नसल्याने दिनांक १ ऑक्टोबर २०२५ पासून भुयारी मार्गांचे काम सुरू करण्यात येईल. पश्चिम बाजूस दोन तर पूर्व बाजूस एका पोहोच रस्त्याचे काम केले जाणार आहे. रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सुसमन्वय साधून पश्चिम बाजूचे पोहोच रस्ते मार्च २०२६ पर्यंत आणि पूर्व बाजूचा पोहोच रस्ता मे २०२६ पर्यंत पूर्ण करावा, असे निर्देश बांगर यांनी दिले. तर, रेल्वे हद्दीतील कामे मे २०२६ पर्यंत पूर्ण होऊ शकतील, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. (BMC)
(हेही वाचा – Gold Rate Fluctuation : सोन्याच्या दरांत उतार चढाव का? वाचा दरांतील विविध टप्पे)
उर्वरित १२ बांधकामे तातडीने हटविली पाहिजेत
बेलासिस पुलाचे काम पूर्णत्वाचा कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र, बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून नोव्हेंबर २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे निर्देश देत अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. पूल बांधकामास अडथळा ठरणारी बांधकामे हटविण्यात आली आहेत. उर्वरित १२ बांधकामे तातडीने हटविली पाहिजेत, व्यावसायिकांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. (BMC)
दोन्ही बाजूंचे पोहोच रस्ते तयार
मशीद बंदर रेल्वे स्थानकानजीकच्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पूर्व दिशेला ८ खांब पूर्ण झाले असून आधारभूत संरचना (पेडेस्टल) स्तरावर काम सुरु आहे. ४० पैकी ५ लोखंडी तुळया (गर्डर) प्रकल्पस्थळी आल्या आहेत. यापुढील काळात पेडेस्टल आणि बेअरिंगचे काम समांतरपणे करावे. २ मे २०२५ पर्यंत लोखंडी तुळ्या स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. ५ जून २०२५ पर्यंत दोन्ही बाजूंचे पोहोच रस्ते तयार करावेत. ७ मे २०२५ पर्यंत रेल्वे भागातील काँक्रिटीकरण तर, १० जून २०२५ पर्यंत पुलाच्या मुख्य वाहतूक मार्गाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community