Ashram School : राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये १६ जून रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’

आदिवासी विकास विभागाचा अभिनव उपक्रम : मंत्री डॉ. अशोक वुईके यांची माहिती

51
Ashram School : राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये १६ जून रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’
  • प्रतिनिधी 

राज्यातील आदिवासी भागातील शैक्षणिक नवचैतन्याला चालना देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. येत्या १६ जून २०२५ रोजी सर्व शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये (Ashram School) ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, या निमित्ताने नव्या शैक्षणिक वर्षाची रंगतदार सुरुवात होणार आहे.

या दिवशी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार असून, पहिलाच दिवस त्यांच्या मनात आनंद, आत्मीयता आणि प्रेरणा निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी व्यक्त केला. डॉ. वुईके म्हणाले, “राज्यात ४९७ शासकीय व ५५४ अनुदानित आश्रमशाळा (Ashram School) कार्यरत आहेत. नाशिक व ठाणे विभागातील शाळा १६ जूनपासून सुरु होतील, तर नागपूर व अमरावती विभागातील शाळा ३० जूनपासून सुरु होतील.” मुंडेगाव येथील शाळेत प्रवेशोत्सवासाठी ते स्वतः उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Ahmedabad Plane Crash नंतर एअर इंडियाने 171 क्रमांक केला रद्दबातल)

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आश्रमशाळांमध्ये ‘परिचारिका’

शैक्षणिक गुणवत्तेसोबतच आरोग्याचाही विचार करुन, प्रत्येक शासकीय आश्रमशाळेत (Ashram School) परिचारिका (नर्स) नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या तात्काळ हाताळल्या जातील. या परिचारिका प्राथमिक उपचार, आरोग्य तपासणी व वैद्यकीय सल्ला देतील, त्यामुळे शाळांमध्ये आरोग्यसाक्षरतेचे वातावरण निर्माण होईल.

‘पवित्र पोर्टल’मुळे शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक

अनुदानित आश्रमशाळांमध्ये (Ashram School) शिक्षक भरती आता ‘पवित्र पोर्टल’द्वारे होणार आहे. यामुळे TET उत्तीर्ण, पात्र शिक्षकच निवडले जातील, आणि शिक्षणाची गुणवत्ता निश्चितच उंचावेल. हा निर्णय आदिवासी विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे डॉ. वुईके यांनी सांगितले.

(हेही वाचा – Shani Shingnapur Devasthan : महंत डॉ. अनिकेतशास्त्री महाराजांकडून देवस्थानाच्या निर्णयाचं स्वागत)

‘राघोजी भांगरे गुणगौरव पुरस्कार’ विद्यार्थ्यांना मिळणार सन्मान

इयत्ता १०वी व १२वी मध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘राघोजी भांगरे गुणगौरव पुरस्कार योजना’ सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्य व विभागीय स्तरावर प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेची भावना आणि अभ्यासावरील लक्ष अधिक वाढेल.

वसतीगृहात विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘समन्वय समिती’

‘वसतीगृह समन्वय समिती’ची स्थापना करण्यात आली असून ती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि प्रशासनाशी संबंधित अडचणी त्वरित सोडवेल. यामुळे प्रशासन व विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद वाढून वसतीगृहातील सेवा व सुविधा अधिक कार्यक्षम होतील.

(हेही वाचा – Heavy Rainfall Forecast : आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क)

‘संवाद चिमुकल्यांशी’मुळे थेट संवाद आणि सुधारणा

राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये (Ashram School) यावर्षी ‘संवाद चिमुकल्यांशी’ या अभिनव उपक्रमांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट शाळांना भेटी दिल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, आरोग्य, स्वच्छता आणि स्वयंपाक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. या संवादातून शासनावरील विश्वास दृढ झाला असून, त्याचा सकारात्मक परिणाम शैक्षणिक वातावरणावर होत आहे.

डॉ. वुईके यांचा निर्धार – गुणवत्ता हीच आमची वचनबद्धता

डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले की, “शैक्षणिक गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आम्ही केवळ प्रवेशाचा दिवस साजरा करत नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत.” १६ जून रोजीचा ‘शाळा प्रवेशोत्सव’ हा केवळ शाळा सुरू होण्याचा दिवस नसून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उभारल्या जाणाऱ्या नवनवीन पायाभूत योजनांचा प्रारंभ आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.