-
प्रतिनिधी
अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळ एअर इंडियाच्या प्रवासी विमानाला भीषण अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत प्रवासी विमान कोसळल्याची भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली. दरम्यान, गुजरातच्या मेघानीनगर परिसरात विमान कोसळले असून यातील सर्व प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. (Ahmedabad Plane Crash)
(हेही वाचा – Ahmedabad Plane Crash : मृत्युमुखी पडलेल्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमान दुर्घटनेवर काय म्हणाले?
अहमदाबाद-लंडन विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक आहे. अपघातात अनेकांनी आपल्या घरातील कर्ते आणि जीवलग गमावले आहेत. काळाने घातलेली ही झडप अनेक कुटुंबियांसाठी शब्दांच्या पलिकडची आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. या सगळ्यांच्या दुःखात आम्ही सर्व महाराष्ट्राची जनता सहभागी आहे. या कठीण प्रसंगात महाराष्ट्रातील नागरिक, आमच्या सर्व यंत्रणा गुजरातमधील शासन-प्रशासनासोबत ठामपणे उभे आहोत. या आपत्तीच्या काळात अपघातग्रस्त परिसरासह, प्रवाशी आणि जखमींसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत सक्रीय सहभाग देण्यात येत आहे.
विमान दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
गुरुवारी दुपारी गुजरातमध्ये घडलेला भीषण विमान अपघात अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारा आहे. या अपघाताच्या दुर्घटनास्थळावरून जे दृश्य समोर येत आहे, ते पाहून काळजाचं पाणी होतं. या अपघातात विमानातील दोन महाराष्ट्रीय कर्मचाऱ्यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. जीव गमावलेल्या सर्व प्रवाशांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगी आम्ही सगळे गुजरात शासनासोबत असून महाराष्ट्र सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. (Ahmedabad Plane Crash)
(हेही वाचा – Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाच्या दुर्घटनेनंतर टाटा समूहाकडून पोस्ट; संवेदना व्यक्त करत अध्यक्ष म्हणाले…)
उपमुख्यमंत्री अजित पवार विमान दुर्घटनेवर काय म्हणाले?
अहमदाबाद विमान अपघातात प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू धक्कादायक, क्लेशदायक आणि दुर्दैवी घटना आहे. या विमान अपघातामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश आज दु:खी असून मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात प्रत्येक महाराष्ट्रवासी सहभागी आहे. अपघाताचं निश्चित कारण अद्याप कळलं नसलं तरी चौकशीअंती ते स्पष्ट होईल. परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे.
विमान दुर्घटनेवर शरद पवार यांची प्रतिक्रिया
गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली आहे. अपघातग्रस्त जखमी प्रवाशांवर उपचार करणाऱ्या आणि घटनास्थळी मदतकार्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना बळ मिळो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. (Ahmedabad Plane Crash)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community