वीर सावरकरप्रेमींचा डंका! अखेर बदलले साहित्य संमेलन गीत

122

यंदा ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार आहे. या संमेलनाचे ठिकाण ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि क्रांतीकारकांची भूमी देखील आहे. असे असताना देखील त्यांच्या नावाचा उल्लेख आणि त्यांच्या साहित्याचा ठसा साहित्य संमेलनातील गीतात कुठेही दिसत नव्हता, यामुळे नाशकासह राज्यभरातील सावकरप्रेमींचे आंदोलन सुरू होते. अखेर वीर सावरकरप्रेमींच्या लढ्याला यश आले आहे. त्यामुळे साहित्यिकांनी संमेलनाच्या गीतात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव समाविष्ट केले आहे.

(हेही वाचा – …म्हणून साहित्य संमेलनस्थळी धडकणार ‘सावकरांच्या साहित्याची दिंडी’)

नाशिकचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, इतिहासकार, उत्कृष्ट वक्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकार्याबरोबरच अनेक ग्रंथ, कादंबऱ्या, पोवाडे, काव्यसंग्रह, वार्तापत्रे, इतर पुस्तकांचे अनुवाद, इतिहास लेखन, भाषाशुद्धी सर्व क्षेत्रात अद्वितीय कामगिरी केलेली आहे. वीर सावरकरांचं दहा हजार पानांचं साहित्य आणि सुमारे बारा हजार ओळींचं काव्य आहे. सावरकरांनी उर्दुमध्ये कविता आणि गझल लिहिल्या.

साहित्य क्षेत्रातील योगदानामुळेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९३८ मध्ये झालेल्या २३ व्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं,  परंतु स्वातंत्र्यानंतरच्या अमृत महोत्सवात आणि वीर सावरकरांची कर्मभूमी असणाऱ्या नाशिकमध्ये हे संमेलन होणार असल्याने त्यांच्याच नावाचा विसर पडणं हे वीर सावरकरप्रेमींसाठी धक्कादायक होते.

अखेर बदलले साहित्य संमेलन गीत

यासंदर्भात माहिती देतांना ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्यवाहक जयप्रकाश जातेगावकर म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या गीतात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव यापूर्वीच होते. त्यामध्ये स्वातंत्र्य सूर्याची उपमा त्यांना दिली होती. सूर्य एकच आहे, म्हणून सावरकरांचा उल्लेख या गीतात स्वातंत्र्य  सूर्य असा केला आहे. आता गाण्यात स्वातंत्र्यसूर्याचा उल्लेख असलेला त्यांचा फोटोही आम्ही समाविष्ट केला आहे.

वीर सावरकरप्रेमींना आले यश

साहित्य संमेलनाच्या गीतात वीर सावरकरांचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे नाशिकमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेमींमध्ये नाराजीचा सूर होता. याकरता भगूरमध्ये त्यांनी निदर्शने केली. दुसरीकडे, राज्यभरातून निषेध पत्र लिहिण्याचा उपक्रम सुरू करण्याची योजनाही तयार करण्यात येत होती. पण, त्याआधीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी गाण्यात ‘स्वातंत्र्यसूर्य सावरकर’ असा उल्लेख करत त्यांचा फोटोही गाण्यासोबत समाविष्ट केल्याचे समोर आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.