भारतातील २६९ दशलक्ष म्हणजेच सुमारे २७ कोटी जनता मागील ११ वर्षांत अत्याधिक गरिबीतून (Extreme Poverty) बाहेर आली आहे. जागतिक बँकेने त्यांच्या एका अहवालात हे म्हटले आहे. जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, अत्याधिक गरिबीचा दर २०११-१२ मध्ये २७.१ टक्क्यावरून २०२२-२३ मध्ये केवळ ५.३ टक्क्यापर्यंत कमी झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील धोरणात्मक उपक्रम आणि आर्थिक सुधारणांमुळे गेल्या दशकात ही प्रगती दिसून आली आहे.
११ वर्षांत, अत्याधिक गरिबीत जगणाऱ्या लोकांची संख्या ३४४.४७ दशलक्ष (३४.४४ कोटी) वरून ७५.२४ दशलक्ष (७.५२ कोटी) पर्यंत कमी झाली आहे. अशाप्रकारे, २६९ दशलक्ष किंवा सुमारे २७ कोटी लोकांना अत्याधिक गरिबीतून (Extreme Poverty) बाहेर काढण्यात आले.
पाच राज्यांचा दोन तृतीयांश वाटा
आकडेवारीनुसार, २०११-१२ मध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये देशातील अत्यंत गरीब लोकसंख्येच्या ६५% लोक होते. आता या पाच राज्यांनी २०२२-२३ पर्यंत राष्ट्रीय गरिबी कमी करण्यात दोन तृतीयांश योगदान दिले आहे.