पूर परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यात आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात

74

पूर परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. शिवाय राज्यभरात ७३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून, आत्तापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात असल्याची माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली.

( हेही वाचा : पुणे-पानशेत मार्गावर कोसळली दरड, रस्त्यावर दगडांचा खच; ३० गावांचा संपर्क तुटला)

एनडीआरएफच्या टीम तैनात

कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३१.८ मिमी पावसाची नोंद झाली असली, तरी सध्या पूर परिस्थिती नाही. मात्र खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून ३० जूलै २०२२ पर्यंत सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. सायंकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १४ मिमी इतका सरासरी पाऊस झाला. वर्धा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने चंद्रपूर शहरातील पाणी ओसरत आहे. इराई धरणातील विसर्ग कमी केला आहे. बल्लारपूर- राजुरा रस्ता बंद असल्याने नारिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनास विनंती केल्याप्रमाणे त्यांनी या दरम्यानच्या स्थानकांवर थांबा दिला आहे. आष्टी-गोंडपीपरी दरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारी बंद आहे. आतापर्यंत नदीकाठच्या ९९४ नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतरीत करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १६ मिमी सरासरी पाऊस झाला असून, जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत. तर गोदावरी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. या नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून ,नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या १०६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत.

कालेश्वरम सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी महत्तम पूर पातळीवरून वाहत आहे.लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे सर्व म्हणजे ८५ दरवाजे उघडण्यात आले असून, १४.४८ लक्ष क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्याता आहे. त्यामुळे नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे. जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक, तसेच एसडीआरएफची २ पथके शोध व बचाव कार्याकरिता तैनात करण्यात आली आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु असून, मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे.

कोठे किती पथके तैनात?

मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १), पालघर -१, रायगड- महाड – २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण -२, कोल्हापूर-२, सातारा-१, सिंधुदुर्ग-१ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -२ नाशिक -१, अशा एकूण चार राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

कायमस्वरूपी ७ तुकड्या

मुंबई ३ आणि पुण्यात २ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे आणि नागपूरमध्ये प्रत्येकी एक राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) कायमस्वरूपी तुकड्या तैनात आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.