Lok Sabha Election 2024 : वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईत, शेवाळेंना धारावीचे मैदान खुले

राहुल शेवाळे यांना धारावी विधानसभा मतदार संघातून मतांची टक्केवारी कमी होईल अशी भीती वाटत होती, ती आता कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

139

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार (Lok Sabha Election 2024) संघातून काँग्रेसच्यावतीने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्याने दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना धारावीतील मैदान मोकळे झाले आहे. वर्षा गायकवाड यांचा धारावी हा प्रमुख गड आहे. परंतु आता त्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याने धारावीकडे त्यांचे दुर्लक्ष होणार असून याचा फायदा शेवाळेंना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वर्षा गायकवाड यांचे धारावीकडे दुर्लक्ष होणार 

दक्षिण मध्य मुंबईतून आपल्याला उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजी नाट्य रचत काँग्रेसच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा व धारावीतील आमदार वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबईतील स्वत:ची उमेदवारी नक्की करून घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या गायकवाड या आता उत्तर मध्य मुंबईतून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे त्यांना उत्तर मध्य मुंबईतच अधिक लक्ष घालावे लागणार आहे. परिणामी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असूनही त्यांना इतर मतदार संघात लक्ष देता येणार नाही की त्यांना त्यांच्या धारावी विधानसभेतही लक्ष देता येणार नाही. राहुल शेवाळे यांना धारावी विधानसभा मतदार संघातून (Lok Sabha Election 2024) मतांची टक्केवारी कमी होईल अशी भीती वाटत होती, ती आता कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा Shiv Sena UBT : शिवाजी महाराज, बाळासाहेब, हिंदुत्व, सावरकर, मराठी माणूस ‘वचननाम्या’तून गायब)

शेवाळेंना फायदा होणार 

सन २०१४ व २०१९च्या लोकसभा (Lok Sabha Election 2024) निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचे आव्हान होते. परंतु दोन्ही वेळेला शेवाळेंनी गायकवाड यांचा पराभव केला. परंतु या दोन्ही निवडणुकीत धारावी विधानसभा क्षेत्रामध्ये शेवाळेंना सर्वांत कमी मतदान झाले होते. त्यातच आता शिवसेना फुटल्याने उबाठा शिवसेना आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी झाल्याने शेवाळेंच्या मतांमध्ये अधिक घट होण्याची भीती वर्तवली जात होती. परंतु आता खुद्द स्थानिक आमदारच बाजुच्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याने त्यांच्या या मतदारसंघातील लक्ष कमी होईल. गायकवाड या उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याने त्यांच्यासाठी हा मतदारसंघ नवा आहे. त्यामुळे या मतदारसंघाची ओळख करून घेण्यापासून ते प्रचारापर्यंत फिरेपर्यंत गायकवाड यांना धारावीत लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही. याचा फायदा शेवाळेंना होण्याची शक्यता आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.