शिवसेना (शिंदे गट) खासदार आणि प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांना ‘आधुनिक दुर्योधन’ संबोधत त्यांनी गंभीर आरोप केले. “महाभारतात दुर्योधनाने भावांना सुईच्या टोकाइतकीही जागा दिली नाही, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना शिवसेनेतून (Shiv Sena) खड्यासारखे बाजूला केले,” अशी टीका म्हस्के यांनी केली. ठाकरे गटात आता गर्दी जमवणारा नेता राहिला नसल्याने महापालिका निवडणुकीसाठी त्यांना राज ठाकरे यांची गरज भासत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
म्हस्के यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला (Waqf Amendment Bill 2025) ठाकरे गटाच्या खासदारांनी केलेल्या विरोधावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “वक्फ बोर्डाच्या जमिनींचा उपयोग देशविरोधी कारवायांसाठी होत असताना सुधारणा विधेयकाला विरोध करता? निवडणुकीत मुल्ला-मौलवींकडून मतांचे आवाहन करता? बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हणायला लाज वाटते, हे तुमचे हिंदुत्व आहे का?” असे जळजळीत शब्दांत त्यांनी विचारणा केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) अस्वस्थ असल्याचा दावाही म्हस्के यांनी केला. “राऊत यांनी राज ठाकरे यांच्या घराला कॅफेटेरिया म्हटले, हे ठाकरेंच्या परवानगीशिवाय शक्य आहे का? घराची टिंगल करणाऱ्यांसोबत राज ठाकरे जातील का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोपही केला. राऊत यांनी शरद पवार यांच्या पक्षाला ‘भेसळ’ म्हटल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहनही म्हस्के यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community