‘विलिनीकरणाचा प्रस्तावच नाही, मग चर्चा कशाची?’; Sunil Tatkare यांची स्पष्ट भूमिका

72
'विलिनीकरणाचा प्रस्तावच नाही, मग चर्चा कशाची?'; Sunil Tatkare यांची स्पष्ट भूमिका
'विलिनीकरणाचा प्रस्तावच नाही, मग चर्चा कशाची?'; Sunil Tatkare यांची स्पष्ट भूमिका

“विलिनीकरणाचा कोणताही प्रस्तावच आमच्याकडे नाही, त्यामुळे त्यावर चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” अशा ठाम शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी आज प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपा किंवा इतर पक्षात विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले, “विलिनीकरणाबाबत ना प्रस्ताव आहे, ना विचार, ना चर्चा – काहीच नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही एनडीएमध्ये (NDA) आहोत आणि एनडीएमध्येच राहणार आहोत.”

(हेही वाचा – पाकिस्तानमध्ये लागले पोस्टर्स; लष्करप्रमुख Asim Munir यांचा खरा चेहरा उघड)

“विलिनीकरणाच्या चर्चांना आधार नाही”

तटकरे (Sunil Tatkare) यांनी माध्यमांमधून सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या चर्चांवर टीका करताना मिश्कीलपणे म्हटले, “जर असा कुठला प्रस्ताव असेल तर तो कुठे आहे, ते तुम्ही सांगा, मी दुर्बिण लावून शोधेन.” त्यांनी स्पष्ट केलं की, आजच्या घडीला असा कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराधीन नाही आणि त्यामुळे अनुकूल किंवा प्रतिकूल भूमिका घेण्याचाही प्रश्न उद्भवत नाही.

एनडीएमधील सक्रिय सहभाग आणि सामूहिक निर्णय

तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले की, “सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा सामूहिक होता. अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि मी – सर्वांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला होता. आमदारांची आणि जनतेची साथ मिळाली, जनसन्मान यात्रा यशस्वी ठरली, आणि पक्षाने प्रभावीपणे आपली भूमिका जनतेपर्यंत पोचवली.”

२०१४ पासून भाजपसोबत चर्चा होती, पण…

तटकरे यांनी यावेळी २०१४ पासून भाजपासोबत सत्तेमध्ये सहभागी होण्याबाबत झालेल्या चर्चांचाही उल्लेख केला. “त्या वेळी निर्णय टप्प्यांपर्यंत पोहोचले, पण निर्णय झाला नाही. मात्र आज जे काही घडत आहे, ते त्या पूर्वसंधीला पूरक नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

(हेही वाचा – IPL 2025, RCB in Top 2 : बंगळुरू संघात विराट कोहलीचं डोकं कोण खातं?)

“शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांपासून तसूभरही दूर गेलो नाही”

तटकरे यांनी जोर देऊन सांगितलं की, पक्षाने आपल्या मूल विचारधारेपासून कोणताही तडजोड केली नाही. “आम्ही फक्त सत्ता मिळवली नाही, तर लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला. लाडकी बहीण योजना, विविध निर्णय, आणि सातत्याने घेतलेली मेहनत यामुळेच लोकसभेत अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या,” असं ते म्हणाले.

“सूत्रांची बातमी असेल, पण आम्हाला त्या सूत्रांचाच शोध घ्यावा लागेल”

तटकरे (Sunil Tatkare) यांनी विलिनीकरणाच्या चर्चांवर माध्यमांमधून येणाऱ्या ‘सूत्रांच्या बातम्या’वरही थेट प्रहार केला. “त्या सूत्रांनी कोणती माहिती दिली? कुठला आधार आहे? आम्हालाच आता ती सूत्रं शोधावी लागतील,” असं त्यांनी हसत उत्तर दिलं.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आणि प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी नेते उपस्थित होते.

“विलिनीकरण नाही, निर्णय स्पष्ट – आमची वाटचाल एनडीएमध्येच!”

तटकरे यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे सध्या चर्चेत असलेला राष्ट्रवादीच्या भवितव्याचा संभ्रम दूर झाला असून, पक्षाची वाटचाल ठामपणे एनडीएमध्येच सुरू राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.