पंतप्रधान म्हणाले, शेतकऱयांची दलालांपासून सुटका झाली

97

नवी दिल्ली – रविवारी, राज्यसभेत विरोधकांच्या गोंधळात आवाजी मतदानाद्वारे  ‘शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन करार आणि कृषीसेवा करार विधेयक २०२०’ आणि ‘कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२०’ ही दोन विधेयके लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर करण्यात आली. यामुळे शेतकऱयांची दलालांच्या तावडीतून सुटका होणार असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांचे अभिनंदन केले.

 

ही विधेयके संमत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त  केला. ‘भारताच्या कृषि इतिहासात आज एक मोठा दिवस आहे. संसदेत महत्त्वाची विधेयके मंजूर होण्यासाठी मी आपल्या कष्टकरीअन्नदात्यांना शुभेच्छा देतो. यामुळे केवळ कृषि क्षेत्रातच अमूलाग्र बदल घडणार नाही तर यामुळे अनेक शेतकरी सशक्त होतील. दशकांपासून आपले शेतकरी बंधू-भगिनी अनेक प्रकारच्या बंधनांत अडकले होते आणि त्यांना अनेक दलालांचा सामना करावा लागत होता. संसदेत ही विधेयके मंजूर झाल्याने अन्नदात्यांची आता या सर्वांतून मुक्तता झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि त्यांची समृद्धी सुनिश्चित होईल’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.

 

‘मी अगोदरही म्हटलं आणि पुन्हा एकदा सांगतो की हमीभावाची (MSP) व्यवस्था सुरूच राहील. सरकारी खरेदीही सुरू राहील. आम्ही इथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. आम्ही अन्नदात्यांच्या मदतीसाठी हरएक संभव प्रयत्न करू आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगलं जीवन सुनिश्चित करू’ असेही पंतप्रधान म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.