-
प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (Shiv Sena) कंबर कसली आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेतील सर्व मंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत विशेषतः ‘जनता दरबार’ या उपक्रमाची आखणी कशी करावी, यावर सविस्तर चर्चा झाली. शिवसेना आता प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांना थेट जनतेशी संवाद साधण्यासाठी जनता दरबार भरवण्याच्या सूचनांसह मैदानात उतरत आहे. यामार्फत स्थानिक पातळीवर मतदारांशी संपर्क साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून भारतीय जनता पक्षाने अनेक जिल्ह्यांत जनता दरबार उपक्रम हाती घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेनेही या रणनीतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपा या दोन्ही पक्षांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युतीतून लढण्याची शक्यता असली तरी, जनतेशी थेट संपर्क साधण्याच्या स्पर्धेतही दोन्ही पक्ष आघाडी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
(हेही वाचा – BMC : आमची मुंबई पालिका कुठे नेऊन ठेवली?)
बैठकीत शिवसेनेतील (Shiv Sena) मंत्र्यांना त्यांच्या जबाबदारीच्या जिल्ह्यांमध्ये दर आठवड्याला एक जनता दरबार घ्यावा, असे निर्देश देण्यात आले. त्यात स्थानिक समस्या, विकासकामे, प्रशासकीय अडचणी, तसेच पक्ष संघटनेशी संबंधित बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे. यामुळे केवळ निवडणूक तयारीच नव्हे, तर शिवसेनेची जनतेशी असलेली जवळीकही अधोरेखित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या बैठकीत निवडणूकपूर्व नियोजन, स्थानिक पातळीवरील बुथ संपर्क, सोशल मीडिया प्रचाराची आखणी, आणि कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणावरही भर देण्यात आला. शिवसेना (Shiv Sena) आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा निवडणुकांमध्ये जोरदारपणे उतरण्याच्या तयारीत असून, मंगळवारची बैठक ही त्या दिशेने एक निर्णायक पाऊल मानली जात आहे. आता या जनता दरबार मोहिमेला जनतेकडून किती प्रतिसाद मिळतो आणि इतर पक्ष यावर काय पवित्रा घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community