-
प्रतिनिधी
शिवसेनेत (Shiv Sena) पडलेल्या फुटीनंतरचे चौथा तर पक्षाचा ५९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. दोन्ही पक्षांकडून याकरिता जोरदार तयारी सुरू आहे. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा माटुंगा येथील षण्मुखानंद तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा वरळी डोममध्ये होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा लक्षणीय आहे. दोन्ही पक्षांकडून मेळाव्याचे टीझर प्रसारित करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) ५६ जागा निवडून आणल्या. तर शिवसेना उबाठाला २० जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना चांगले यश मिळाले. परंतु, विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदेंनी बाजी मारली. मुंबईत केवळ १० जागा शिवसेना उबाठाला राखता आल्या. येत्या दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार उडण्याची चिन्हे आहेत. येत्या निवडणुकीपूर्वी मनसे – शिवसेना उबाठा एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवकांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.
(हेही वाचा – Municipal Corporation Election मध्ये मविआमध्ये पडणार फूट; काँग्रेसची स्वबळाची तयारी सुरू)
या पार्श्वभूमीवर ठाकरे कार्यकर्त्यांना कोणता संदेश देणार, कोणते राजकीय भाष्य करणार किंवा कुणाला लक्ष्य करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पक्षाचे सर्व नेते, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, विविध संघटनांचे प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. नुकतेच शिवसेना उबाठाचे नाशिकमधील सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोळप यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाने यापुर्वी बडगुजर यांच्यावर आरोप केले होते. यावर ठाकरे काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणेही उत्सुकतेचे असणार आहे.
वरळी येथील डोम येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचा (Shiv Sena) वर्धापन दिन साजरा होणार आहे. विधानसभेत दुसऱ्या क्रमांकावर पक्षाचे बलाबल असल्याने शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला आहे. अशातच मोठ्या प्रमाणात मुंबईसह राज्यभरातील लोकप्रतिनिधी पक्षात प्रवेश करत आहेत. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा कायम फडकला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री शिंदे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात, याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचा – BMC : बेवारस आणि भंगारवजा वाहने रस्त्यावरुन हटवून त्यांची विल्हेवाट लावण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश)
आदित्य ठाकरे – श्रीकांत शिंदे आमने-सामने
आगामी मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना (Shiv Sena) खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि नियोजनाखाली लढणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा आणि श्रीकांत यांचे नेतृत्व व नियोजन या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे थेट आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
शहर भगवामय
मुंबईत होणाऱ्या दोन्ही पक्षांच्या मेळाव्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. वरळी आणि माटुंगा परिसरात ठिकठिकाणी दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे, पोस्टर लावून परिसर भगवामय केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community