-
प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात शोकाकुल वातावरण आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत मराठी भाषिकांचे कैवारी म्हणवणारे ढोंगी राजकारणी कुटुंबासह परदेशात वाइल्डलाइफ फोटोग्राफी आणि पर्यटनात मग्न असल्याची खोचक टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी शिवसेना उबाठावर केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निरुपम यांनी शिवसेना उबाठाने महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत कोणतीही संवेदना व्यक्त न केल्याचा आरोप केला. तसेच, केंद्र सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडेही त्यांनी पाठ फिरवल्याचे नमूद केले.
निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले, “महाराष्ट्रातील मराठी पर्यटकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: श्रीनगरला धावून गेले, तर दुसरीकडे मराठींचे तथाकथित कैवारी युरोपात कौटुंबिक सहलीचा आनंद लुटत आहेत. त्यांची आवड वाइल्डलाइफ फोटोग्राफी आणि परदेशी खाद्यपदार्थांमध्ये आहे, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत संवेदना व्यक्त करण्यास वेळच मिळाला नाही.” पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी केंद्र सरकारच्या कठोर निर्णयांचे स्वागत केले.
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack च्या पार्श्वभुमीवर जॉर्जियो मेलोनींचा पंतप्रधान मोदींना फोन ; म्हणाल्या …)
निरुपम (Sanjay Nirupam) यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये सध्या महाराष्ट्राचे सुमारे २,००० पर्यटक अडकले आहेत. महायुती सरकारने त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. शिवसेनेच्या पुढाकाराने स्टार एअरलाइन्स आणि अकासा एअरलाइन्सच्या प्रत्येकी दोन फेऱ्यांद्वारे ५२० पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरला भेट देऊन पर्यटकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली. मात्र, या दौऱ्यावर टीका करणाऱ्यांची नीच वृत्ती दिसून आल्याचा टोला निरुपम यांनी लगावला.
पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असून, ही संघटना पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबाशी संलग्न आहे. निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केंद्र सरकारने पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडणे, सिंधु पाणी करार स्थगित करणे आणि अटारी सीमा बंद करण्याच्या निर्णयांचे कौतुक केले. तथापि, यावर न थांबता केंद्राने पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करावी, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करावेत आणि दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या स्थानिकांवर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली. निरुपम यांच्या या टीकेमुळे शिवसेना उबाठा आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महायुती सरकारने दाखवलेली तत्परता आणि शिवसेना उबाठाच्या नेत्यांची अनुपस्थिती यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community