काही दिवसांपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता संग्राम थोपटे (Sangram Thopte) हे काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्यामुळे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. यामुळे काँग्रेसला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. आता संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी कॉँग्रेस सोडताना यामागील कारणांची यादीच मांडली.
काँग्रेस सोडण्याची वेळ पक्षानेच आणली आहे. पक्षाने मला संधीच दिली नाही. अनेक वेळा डावलण्यात आले. कार्याध्यक्षपद दिले नाही, विरोधी पक्षनेतेपदाची अपेक्षा होती, तीही पूर्ण झाली नाही. नाना पटोले यांनी राजीनामा दिला त्यावेळी विधानसभा अध्यक्षपद मिळेल, असे वाटले; पण, तिथे ही संधी मिळाली नाही. राजकीय दृष्टिकोनातून पक्ष ताकद देत नव्हता, म्हणूनच मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना वाटत होते की, भाजपामध्ये आपल्याला न्याय मिळू शकेल. सलग तीन वेळा निवडून आलो, पण पक्षाने ताकद द्यायला पाहिजे, ती दिली नाही. पश्चिम महाराष्ट्रात जर ताकद दिली असती तर विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळे पाहायला मिळाले असते, असे संग्राम थोपटे (Sangram Thopte) म्हणाले.
मला पक्ष प्रवेश करताना कोणते आश्वासन दिले नाही. मी कोणत्याही पदासाठी गेलो नाही. २०१९ पासून नाराजीला सुरुवात झाली. पुणे जिल्ह्यात वजन वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. फॉर्म भरायला पक्षश्रेष्ठींना बोलावले, कुणी वेळ दिला नाही. मी पडल्यावर पण मला फोन केला नाही. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये आश्वासक चेहरा नाही. अनेक प्रकल्प आहेत. त्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळाला नाही. अनेकदा कात्री लागली. सत्ता असताना काही कामे झाली नाहीत. मुळशी तालुक्यात लोकसभेला मतदान झाले ते विधानसभाला झाले नाही. कार्यकर्त्यांनी कामे केले नाही, अशी खंत संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community