Raj Thackeray : मनसेच्या ‘त्या’ लढाईला अखेर यश मिळाले; राज ठाकरेंनी मानले न्यायालयाचे आभार

197
Raj Thackeray : मनसेच्या 'त्या' लढाईला अखेर यश मिळाले; राज ठाकरेंनी मानले न्यायालयाचे आभार

दुकानांवरील मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मुंबईतील सर्व व्यापारी संघटनांची सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी करत येत्या दोन महिन्यांमध्ये सर्व दुकानांवर मराठी पाट्या लागल्याच पाहिजे असे ठणकावून सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वागत करण्यात आले असून राज ठाकरे यांनी न्यायालयाचे आभार मानले आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणले की; “पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. ‘मराठी पाट्या’ ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली.”

(हेही वाचा – Supreme Court : मराठी पाट्यांवरून सर्वोच्च न्यायालयाकडून व्यापारी संघटनेची कानउघाडणी)

भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं?

“मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेमधील पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात (Raj Thackeray) असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे.”

प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी

पुढे बोलतांना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की; “माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे.”

दुकानदारांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा

“दुकानदारांनी नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका. ‘मराठी पाट्या’ ह्याबाबत जागृती ही माझ्या (Raj Thackeray) महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.