Rahul Narwekar : १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोणत्या निकषावर आणि कधी घेणार?; राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितले

जुलै २०२२ मध्ये राजकीय पक्ष कोणता गट होता, याची खात्री केल्यानंतर त्या पक्षाने नेमलेल्या प्रतोदला मान्यता द्यावी लागेल.

181
Rahul Narwekar : १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोणत्या निकषावर आणि कधी घेणार?; राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे असा (Maharashtra Political crisis) सत्तासंघर्ष सुरु झाला. या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार ११ मे २०२३ रोजी आपला निर्णय दिला. त्या निर्णयानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यावरून महाविकास आघाडी पक्षाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर टीका होत होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर परंतु घाईने घेणार नाही.’

नेमकं काय म्हणाले राहुल नार्वेकर?

आमदार अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न आहे मात्र यामध्ये कोणतीही घाई करणार नाही. प्रत्येक केसचा वेळ हा वेगवेगळा असतो. मी कोणाच्याही दबावाखाली येऊन निणर्य घेणार नाही. सर्वप्रथम राजकीय पक्ष कोणता आहे यावरून पुढील निर्णय घेण्यात येईल. जुलै २०२२ मध्ये राजकीय पक्ष कोणता गट होता, याची खात्री केल्यानंतर त्या पक्षाने नेमलेल्या प्रतोदला मान्यता द्यावी लागेल. ती मान्यता दिल्यानंतर मग अपात्रतेच्या संदर्भात विचार करावा लागेल. यावेळी बघावं लागेल की कुणाचा व्हिप लागू होता. तो पाळला गेला होता की नाही. त्या बाबींवर व्हिप काढणं योग्य होतं का? हे पाहावं लागेल. (Rahul Narwekar)

(हेही वाचा – Uddhav Thackeray : ‘…तर आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ’ – उद्धव ठाकरे)

माझ्याकडे पाच पेक्षा अधिक याचिका आल्या आहेत. या प्रत्येक याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे अंतिम निर्णय केव्हापर्यंत येईल हे सांगता येणार नाही. हा निर्णय संविधानातील नियमानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसारच घेतला जाईल. (Rahul Narwekar)

भारत गोगावले यांची पुन्हा नियुक्ती होऊ शकते

दरम्यान, शिंदे गटच पक्षाचं प्रतिनिधित्व करतो असं समोर आल्यास भरत गोगावलेंची निवड मान्य करावी लागेल, असं नार्वेकर म्हणाले. “भरत गोगावलेंच्या निवडीला मान्यता देताना आम्ही ते राजकीय पक्षाते प्रतिनिधी होते की नाही याची खातरजमा न करता दिली. त्यामुळे तो निर्णय न्यायालयाने बाद ठरवला आहे. पण याचा अर्थ कायमच भरत गोगावलेंची निवड नियमबाह्य आहे असं होणार नाही. उद्या जर असं समोर आलं की राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंकडेच होता, तर आम्ही त्यांनाच मंजुरी देऊ. उद्धव ठाकरे राजकीय पक्षाचे अध्यक्ष होते असं समोर आलं तर त्यांनी ज्याची निवड केली आहे त्यांना मान्यता द्यावी लागेल”, असंही नार्वेकरांनी (Rahul Narwekar) स्पष्ट केलं.

हेही पहा – 

संजय राऊत यांच्या टीकेला महत्व देत नाही

सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवल्यापासून ठाकरे गटाकडून सतत त्यांच्यावर टीका होत आहे. अध्यक्षांनी निःपक्ष आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा, येत्या तीन महिन्यात त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून सतत होत आहे. मात्र मी संजय राऊत यांच्या टीकेला फारसं महत्व देत नाही. प्रत्येक केसची वेळ ही वेगवेगळी असते. त्यामुळे मी कोणाच्याही दबावाखाली न येत लवकर पण घाईत कुठलाही निर्णय घेणार नाही. असं राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सांगितलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.