काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकर यांच्याविरोधात बिनबुडाचे आरोप करत त्यांची बदनामी केली. त्यावर वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयात बदनामीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. या खटल्यापासून राहुल गांधी (Rahul Gandhi) लांब पळत आहेत, त्यासाठी ते नेहमी नवनवीन अर्ज करत असतात. या वेळी त्यांनी सात्यकी सावरकर यांची आईकडील वंशावळ मागितली, तसेच सात्यकी सावरकर यांनी त्यांचे नथुराम गोडसे यांच्याशी असलेले नाते लपवून न्यायालयाचा अवमान केला आहे, असा दुसरा अर्ज दाखल केला. हे दोन्ही अर्ज खासदार/आमदार विशेष न्यायालयाने फेटाळून लावले. त्याचवेळी याचिकाकर्ते सात्यकी सावरकरांचे अधिवक्ता संग्राम कोल्हटकर यांनी राहुल गांधी यांच्याकडे अशी मागणी केली आहे, ज्यामुळे राहुल गांधी यांची पुढच्या सुनावणीच्या वेळी चांगलीच गोची होणार आहे.
राहुल गांधी हे हा खटला टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न करत आहेत. त्यांनी आजवर तीन वेळा वेगवेगळे अर्ज करून वेळकाढूपणा केला. तसेच न्यायालयाने ४ वेळा समन्स काढून त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी आदेश दिले, परंतु प्रत्येकवेळी त्यांनी कोणते ना कोणते कारण देत टाळाटाळ केली. न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंटही काढला होता, मात्र संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहायचे कारण देत त्यांनी जामीन मिळवला. राहुल एका बाजूला प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून खटल्याच्या कामात सहभागी होण्याचे टाळत न्यायालयाचा अनादर करत आहेत, आणि त्याचवेळी दुसरीकडे वकिलाच्या मार्फत प्रत्येकवेळी अनावश्यक कारणांसाठी नवनवीन अर्ज करून वेळकाढूपणा करत आहेत.
(हेही वाचा पाकिस्तानमध्ये लागले पोस्टर्स; लष्करप्रमुख Asim Munir यांचा खरा चेहरा उघड)
यावेळी राहुल गांधी यांनी चक्क याचिकाकर्ते सात्यकी सावरकर यांच्यावरच बिनबुडाचे आरोप करत चोर तो चोर वर शिरजोर, असे वर्तन केले. राहुल गांधी यांनी सात्यकी यांची त्यांच्या आईच्या बाजूची वंशावळ एका अर्जाच्या माध्यमातून मागितली, तर दुसऱ्या अर्जात सत्याकी सावरकर यांचे नातेसंबंध नथुराम गोडसे यांच्याशी आहेत, ही माहिती त्यांनी न्यायालयापासून लपवली, त्यामुळे त्यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे, असे म्हटले. त्यावर सात्यकी सावरकर यांचे अधिवक्ता संग्राम कोल्हटकर त्यांनी त्याचवेळी तिथेच न्यायालयात लेखी उत्तर देत त्यावर युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने राहुल गांधी यांचे दोन्ही अर्ज फेटाळून लावले. सात्यकी सावरकर यांचा खटला वीर सावरकर यांच्याविषयी आहे. त्यामुळे त्यांचे वीर सावरकर यांच्याशी रक्ताचे नाते आहे का, हे पडताळणे महत्वाचे आहे आणि न्यायालयाने ते पडताळून पाहिले आहे, असे म्हणत न्यायालयाने दोन्ही अर्ज फेटाळून लावत राहुल गांधींना सणसणीत चपराक मारली आहे.
सात्यकी सावरकर यांनी मागितला राहुल गांधींकडे पुरावा
त्यानंतर सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींकडे पुरावा मागितला आहे. राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले की, एक समुदाय दोन मुसलमानांना मारत होते, ते पाहून आम्हाला आनंद होत होता.’ आता सात्यकी सावरकर यांनी मागणी केली आहे की, राहुल गांधी यांनी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे, ते पुस्तक राहुल गांधी यांनी न्यायालयात सादर करावे. जर त्यांनी ते सादर केले नाही, तर न्यायालयाने त्याची नोंद घ्यावी.
त्यामुळे पुढील सुनावणीच्या वेळी राहुल गांधी यांना हे पुस्तक सादर करावे लागणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची आता चांगलीच गोची होणार आहे.
Join Our WhatsApp Community