Pakistani Citizens : जम्मू-काश्मीर जवळील पहलगाम (Pahalgam terrorist attack) येथे २२ एप्रिलला आतंकवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानी नागरिकांबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विविध राज्यांमध्ये कारवाया सुरू झाल्या आहेत. राज्यात 48 भागात 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक नागपूर येथे आढळून आले आहेत. नागपुरात 2458 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत. सध्या त्यांचे आयडेंटिफिकेशन सुरू असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिली. (Pakistani Citizens)
(हेही वाचा – सरकारचे Press Media ला आदेश, कुठल्याही सैनिकी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; अन्यथा कारवाई करू)
पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध तनावग्रस्त झाले आहेत. अशातच केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या आदेशानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले 18 प्रकारचे सर्व व्हिसा 27 एप्रिलपासून रद्द करण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत पाठवा अशी सूचना केंद्र सरकार तर्फे देण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 48 शहरांत 5023 पाकिस्तानी नागरीक आढळलेत. यापैकी 107 जण बेपत्ता असून, त्यांचा कोणताही पत्ता तपास यंत्रणांना लागत नाही. राज्यात सर्वाधिक 2458 पाकिस्तानी नागपूर शहरात आढळलेत. त्यानंतर ठाण्यात 1106, तर मुंबईत 14 पाकिस्तानी राहत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे यापैकी केवळ 51 पाक नागरिकांकडेच वैध दस्तऐवज आढळलेत.
वैद्यकीय उपचारांसाठी आणखी दोन दिवस वाढवले
योगेश कदम म्हणाले, आजमितीस महाराष्ट्रात 5 हजार 23 पाक नागरीक आहेत. यातील एक कॉलम अनट्रेसेबल पाक नागरिकांचा आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत संपली आहे. भारतीय यंत्रणांना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवायचे आहे. पण त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाही. तूर्त सार्क व्हिसा व शॉर्ट टाईम व्हिसावर आलेल्या पाक नागरिकांना 2 दिवसांत म्हणजे 28 तारखेपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जे पाकिस्तानी वैद्यकीय उपचारांसाठी येथे आलेत. त्यांना 2 दिवस वाढवून देण्यात आलेत. त्यांनी 30 तारखेपर्यंत भारत सोडायचा आहे. राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करणे अजून सुरू असल्यामु्ळे या आकडेवारीत बदल होऊ शकतो, असेही योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी याविषयी बोलताना सांगितले.
(हेही वाचा – मालेगावमध्ये ED च्या ९ ठिकाणी धाडी; बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्यांकडून बनावट जन्म दाखले जप्त)
पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर- देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई होईल. असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले.