बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच राज्याचा मुख्यमंत्री झालो – एकनाथ शिंदे

142

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूस्थानी असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली आणि वंदन केले. त्यांचे आशीर्वाद कायम पाठिशी आहे. यामुळेच माझ्यासारखा सामान्य नेता राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांसोबत आमदार संजय शिरसाठ, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर यांनी देखील दर्शन घेतले.

(हेही वाचा – राष्ट्रपती देश सोडून पळून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर)

पुढे बोलताना ते असेही म्हणाले, राज्याचा मुख्यमंत्री झालो या निमित्ताने बाळासाहेबांचे विचार माझ्यासह ५० आमदार पुढे नेणार आहे. बाळासाहेबांनी नेहमीच सामान्य माणसांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने त्यांचे विचार राज्यात पुढे नेण्याचे काम करणार आहे. यासह सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम हे युती सरकार करणार आहे, या राज्याचा सर्वांगिन विकास हे सरकार करेल. तसेच समाजातील सर्व घटकांचा उत्कर्ष करणं आणि राज्याचा विकास करणं हेच ध्येय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याच्या निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सकाळपासूनच सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर रात्री उशिरा देखील मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशीही चर्चा झाली आहे. धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. एकंदरीत राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत. पण दुर्देवाने तशी वेळ आल्यास त्या ठिकाणी तत्काळ आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा पोहचतील असे प्रयत्न आहेत. आतापर्यंत ज्यांना स्थलांतरित केले आहे, त्यांना जेवण तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.