NCP-SP : प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा कोण? जयंत पाटलांच्या मागणीनंतर ‘ही’ नावे आहेत चर्चेत!

93
NCP-SP : प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा कोण? जयंत पाटलांच्या मागणीनंतर 'ही' नावे आहेत चर्चेत!
  • प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये मोठा नेतृत्वबदल घडण्याच्या दिशेने पावलं उचलली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट शरद पवार यांच्यासमोर “मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा” अशी स्पष्ट मागणी केल्याने, पुढचा अध्यक्ष कोण होणार यावर राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. (NCP-SP)

वर्धापन दिनीच दिला भावनिक सूतोवाच

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिन सोहळ्यात जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत म्हटले, “पवार साहेबांनी मला सात वर्षे संधी दिली. पण आता नवीन चेहऱ्यांना संधी देणे गरजेचे आहे. पक्ष हा साहेबांचा आहे आणि त्यांनी यावर योग्य निर्णय घ्यावा.” त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये भावना अनावर झाल्या. (NCP-SP)

(हेही वाचा – World Test Championship : कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत लढतील ‘या’ तीन उप लढती)

पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण?

जयंत पाटील यांच्या सूचक मागणीनंतर आता नवीन प्रदेशाध्यक्षाच्या नावावर चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंत तीन प्रमुख नावं चर्चेत आहेत :

राजेश टोपे

मराठवाड्यातील मजबूत जनाधार, सुप्रिया सुळे व शरद पवार यांचे निकटवर्तीय. कोरोना काळात आरोग्यमंत्री म्हणून त्यांच्या कामगिरीने राज्यभरात प्रसिद्धी मिळवली. कमी वादग्रस्त आणि समन्वयक म्हणून ओळख.

शशिकांत शिंदे

पश्चिम महाराष्ट्रात ठसा उमटवलेले नेते. सातारा आणि नवी मुंबईत चांगली पकड. अनुभवी, संयमी आणि संघटन क्षमतेसाठी प्रसिद्ध. पक्षाच्या आक्रमक प्रचार मोहीमेसाठी सक्षम चेहरा मानला जातो.

डॉ. अमोल कोल्हे

तरुण खासदार, उत्तम वक्ता आणि लोकप्रिय चेहरा. नव्या पिढीतला नेता म्हणून त्यांच्याकडेही पाहिले जात आहे. सोशल मिडिया व नागरी भागांमध्ये प्रभावी. (NCP-SP)

(हेही वाचा – India Tour of England : गिल, रिषभ यांचा लंडनमध्ये फलंदाजीचा सराव; बुमराहही ॲक्शनमध्ये)

शरद पवारांचं संकेतात्मक उत्तर

जयंत पाटील यांच्या सूचनेवर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “जयंत पाटलांनी सांगितले की नव्या चेहऱ्यांना संधी द्या. आपण सगळे एकत्र बसून निर्णय घेऊ. प्रत्येक तालुक्यात नवे चेहरे दिसले पाहिजेत.” यावरून पवार नव्या नेतृत्वासाठी सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले.

सुळे म्हणतात : ‘राजीनामा आलेला नाही’

त्यानंतर मीडियाशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं की, “पाटील यांनी राजीनामा दिला नाही. त्यांनी काही पत्र दिलेलं नाही.” मात्र, त्यांच्या भाषणातून राजीनाम्याचा स्पष्ट संकेत मिळाल्यामुळे आता केवळ औपचारिकतेची प्रतीक्षा असल्याचे जाणकार सांगत आहेत.

जयंत पाटलांच्या राजकीय भूमिकेतील हा बदल शरद पवार गटासाठी निर्णायक ठरणार आहे. नव्या चेहऱ्यांच्या शोधात असलेल्या पक्षाला एक अनुभवी आणि प्रभावी चेहरा हवा आहे, जो पक्षाला निवडणुकीच्या रणधुमाळीत पुढे नेऊ शकेल. त्यामुळे शशिकांत शिंदे, राजेश टोपे आणि अमोल कोल्हे या नावांभोवती राजकीय वर्तुळात उत्सुकता अधिकच वाढली आहे. निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे! (NCP-SP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.