- स्वप्नील सावरकर
राज्यात आजवर ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड्स म्हणून चर्चिले गेले. पण, भाजपाने या दोन्ही पक्षांची अवस्था ओसाड गावच्या पाटलांसारखी करून ठेवली आहे. बाळासाहेबांचा वारसा त्यांच्या आत्मघाती वारसांनीच गमावल्याने भाजपाच्या डावपेचांना अधिक यश आले. उद्धव ठाकरेंची अवस्था तर न घर का ना घाट का अशी होणार आहे म्हणण्यापेक्षा झाली आहे, असेच म्हणावे लागेल. उघडपणे मुस्लिम लांगुलचालन करताना हिंदुत्वावरही दावा करण्याची केविलवाणी धडपड त्यांचा सकाळचा भोंगा म्हणवला जाणारा प्रवक्तावजा खासदार संजय राऊत अजूनही करताना दिसतात. आता त्यात एक नवं खूळ त्यांनीच आपल्या रोजच्या बूमधारी मित्रांपुढे मांडलंय. ते म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार! पण, ‘पहले आप पहले आप’ करत गाडी सुटण्याची प्रतीक्षा दोघंही करत बसलेत. त्यामुळे, कोण पहिल्यांदा डोळा मारतंय, शिटी मारतंय की हात पुढे करतंय हे पाहत टीआरपी खेचण्याचं काम बूमधारी मीडियाला करावं लागणार आहे. (Maharashtra Politics)
ब्रॅंड्सचा बँड वाजणार?
अर्थात, दोन्ही ठाकरे ब्रँड्सचे ‘इगो’ इतके उंचावले आहेत की त्यांच्या कार्यापेक्षाही ते मोठे झालेत. त्यामुळे, या ठाकरे विभाजनाचे शकुनी म्हणून शिव्या खाणाऱ्या संजय राऊतांनीच काहीही का होईना, कुणाचीही मध्यस्थी करून दोन्ही ठाकरेंना एकदाचे एकत्र आणावे आणि खरंच यांची ताकद मुंबईत तरी किती उरलीय हे पाहावं, असं मनापासून वाटतंय.
संपलेल्या पक्षाबद्दल काय बोलायचे वगैरे अनेक डायलॉग आजच्या काळात विस्मृतीत जाणं फार कठीण आहे आणि लाव रे तो व्हिडिओच्या निर्मात्यांना तर त्यांच्याच बेडूकउड्या त्रासदायक ठरत आहेत, हे तेही जाणताहेत. अर्थात, ठाकरे एकत्र येणं हे मुंबईत उरलेल्या १७-१८ टक्के मराठी माणसाला भावणार आहे, असं चित्र ट्रेंडमध्ये आणण्यात सोशल मीडिया एजन्सी यशस्वी ठरल्यात, असे सध्या म्हणूयात. (Maharashtra Politics)
(हेही वाचा Qurbani : बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीचा कचरा उचलण्यास हिंदू धर्मीय स्वच्छता कामगारांचा नकार)
ताईंना कोण वाचवणार?
आता, ठाकरेंप्रमाणे पवार ब्रँडचं काय होतंय, याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. दोन्ही पवार एकत्र येणार, ही आवई मीडियामध्ये उठवली गेली. दोन्ही बाजूच्या नेत्यांनीही अफवेची री ओढली असली तरी प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे, असे समजते… खाजगीमध्ये काकांविषयी ‘एकच मारा पण सॉलीड मारा’सारखा डायलॉग मारण्यात आल्याचं कळतंय. काकांना तुम्ही ओळखत नाही का? असा सवाल करत अक्षय कुमारच्या ‘जो मे बोलता हूँ वो नही करता और जो मे नही बोलता वो…’ या डायलॉगची आठवणही करून दिली. थोडक्यात काय, तर ढगफुटीसारखा फुटणारा पक्ष अजून काहीकाळ तरी जिवंत राहावा, यासाठी खेळलेली ही खेळी आहे, असे पुतण्यांच्या बाजूने सांगितलं गेलंय. (Maharashtra Politics)
शेवटी शरद पवार कशाला म्हणतात, हेच कळत नाही सांगून संभ्रम निर्माण करायचा आणि हुकमाचा एक्का शेवटपर्यंत खिशात ठेवायचा, ही पवारनीती अजूनही कायम आहे. पण, दरवेळी तीच खेळी चालत नाही. आता तुमचेच तुमच्या विरोधात गेलेत, हेही लक्षात घेण्यात काका कमी पडताहेत, असंच म्हणावे लागेल. त्यामागेही एका बापाची व्यथा असणं स्वाभाविकच आहे. एकच साधं उदाहरण समोर ठेवतो. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा आमदार आता राष्ट्रवादी शरद पवारांचे नाहीत. दौंड (राहुल कूल) आणि खडकवासला (तापकीर) भाजपाकडे तर पुरंदर (विजय शिवतारे) शिवसेना शिंदेंकडे आहे. बारामती विधानसभेत तर स्वतः अजितदादाच आहेत. उरलेल्या भोरमधले शंकर मांडेकर आणि इंदापूरचे दत्तात्रय भरणेही दादांसोबत आहेत. तेव्हा, अकेला देवेंद्र क्या करेगा डायलॉग मारून फसलेल्या सुप्रियाताईंचे भविष्य किती उज्ज्वल आहे, हे तुमच्या लक्षात आले असेलच. मग, ते शरद पवारांच्या लक्षात येणार नाही? असो, घोडा मैदान जवळच आहे. (Maharashtra Politics)
Join Our WhatsApp Community