सोमय्यांवरील हल्ल्याची एफआयआर खोटी! 

127
राणा दाम्पत्याना खार पोलिसांनी अटक केली, तेव्हा भाजपचे नेते किरीट सोमय्या हे त्यांना भेटायला गेले. त्यावेळी तेथील शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला केला. याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडून खोटी एफआयआर वितरित केली जात आहे, असा आरोप करत सोमय्या यांनी या प्रकरणी आपण मंगळवार, २५ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे, असे सांगितले.

काय म्हटले सोमय्यांनी ट्विटमध्ये?  

किरीट सोमय्या यांनी यासंबंधीचे ट्विट करत ही माहिती दिली. २३ एप्रिल रोजी आपल्यावरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलीस खोटी एफआयआर वितरित करत आहेत. आपण कोणतीही एफआयआर दाखल केली नाही. वांद्रे पोलीस ठाण्याने एफआयआर दाखल करून घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आपण मंगळवारी, २६ एप्रिल रोजी खार पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे. तसेच या खोट्या एफआयआरप्रकरणी कारवाईची मागणी करणार आहे, असे सोमय्या म्हणाले.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्रात शनिवारी, 23 एप्रिल रोजी हनुमान चालिसा पठणावरुन हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. या अटकेनंतर त्यांना तुरुंगात भेटण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या गेले आणि त्यांच्या गाडीवर जमावाकडून हल्ला करण्यात आला. या जमावाने केलेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप करत, किरीट सोमय्या यांनी दिल्लीत गृहसचिवांनी भेटणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी सोमवारी गृहसचिवांची भेट घेतली. 20 मिनिटे झालेल्या भेटीनंतर किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्यांसह राज्यातील इतर व्यक्तींवर झालेले हल्ले हे चिंताजनक असून महाराष्ट्रातील परिस्थितीचा अभ्यास करुन गरज पडली तर केंद्रीय गृहखात्याची टीम महाराष्ट्रात पाठवू, असे आश्वासन केंद्र सरकारचे गृहसचिव अजय भल्ला यांनी दिल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. यानंतर काही तासांतच पोलिसांनी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह तीन माजी नगरसेवकांना अटक केली आणि त्यानंतर जामीन देण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.