विधवा महिलांचा ‘गंगा भागीरथी’ उल्लेख; वाद पेटल्यावर काय म्हणाले मंत्री मंगलप्रभात लोढा?

88

राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधवा महिलांसाठी ‘गं.भा’ म्हणजेच गंगा भागीरथी असा उल्लेख करावा असा प्रस्ताव मांडला. मात्र त्यांच्या या प्रस्तावावरून अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि काही महिला कार्यकर्त्यांकडून प्रखर विरोध दर्शवला जात आहे. यावरून आता राजकारण होतांना दिसून येत आहे. या सगळ्या प्रकरणावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

समाजातील महत्व वाढेल

विधवा महिलांना गं.भा म्हणून संबोधण्यात यावं याबाबतच्या प्रस्तावावर अजून कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. मी केवळ महिला आणि बालकल्याण मंत्रालयातील प्रधान सचिव यांच्यापर्यंत पत्र लिहून माझा प्रस्ताव कळवळा आहे. त्यावर अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे यावरून राजकारण करणे याला काहीच अर्थ नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मंत्री लोढा यांच्या विचारांनुसार अपंगांना दिव्यांग संबोधल्यामुळे त्यांचे समाजातील महत्व वाढते. त्या सगळ्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो. म्हणूनच यापुढे विधवा महिलांचा विकास होण्यासाठी त्यांच्याकडे बघण्याची समाजाची दृष्टी बदलावी म्हणून त्यांचा ‘गंगा भागीरथी असा उल्लेख केला गेला पाहिजे.

(हेही वाचा उत्तर प्रदेश: कुख्यात गॅंगस्टरच्या मुलाचा स्पेशल टास्ककडून एन्काऊंटर)

लोढांवर टीका

मात्र दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी परखड शब्दांमध्ये या प्रस्तावावर टीका केली आहे. फक्त नाव बदलून परिस्थिती बदलत नाही. परिस्थिती बदलण्यासाठी त्या व्यक्तीच्या समस्या मुळापासून जाणून घेणे गरजेचे आहे. अपंगांना दिव्यांग म्हणून किंवा दलितांना हरिजन म्हणून त्यांच्या वेदना कमी होत नाहीत. त्यांच्या परिस्थितीमध्ये काहीच बदल होत नाही. त्यामुळे विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी म्हणणे हे फार चुकीचे आणि हास्यास्पद आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.