-
प्रतिनिधी
शिवसेना उबाठात (Shiv Sena UBT) पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजीचे वादळ उठले असून, ज्येष्ठ नेते संजय राऊत आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यातील जुना संघर्ष नव्याने चिघळताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या बहुचर्चित ‘ऑपरेशन सिंदूर’ दौऱ्यात प्रियांका चतुर्वेदी यांचा सहभाग आणि त्यावर राऊत यांनी व्यक्त केलेली तीव्र नाराजी यामुळे पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोरात चर्चिली जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ या परराष्ट्र दौऱ्यावर ५१ खासदारांच्या प्रतिनिधी मंडळात चतुर्वेदी सहभागी झाल्या आहेत. यामध्ये काँग्रेसचे शशी थरूर, द्रमुकच्या कनिमोझी, भाजपाचे बैजयंत पांडा आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांचाही समावेश आहे. मात्र, संजय राऊत यांनी या दौऱ्याला “बारात” असे म्हणत इंडिया आघाडीने त्यावर बहिष्कार टाकावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे चतुर्वेदी यांच्या निर्णयाने राऊत संतप्त झाले आहेत.
(हेही वाचा – काशी, मथुराच नव्हे, तर प्रत्येक मंदिर मुक्तीसाठी हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक; अधिवक्ता Vishnu Shankar Jain यांचे प्रतिपादन)
मंगळवारी सकाळी पत्रकार परिषदेत राऊत यांनी, “हा दौरा म्हणजे केवळ दिखावा आहे. पक्षातील काही नेते केंद्राच्या चमक-धमकपुढे झुकतात, हे दुर्दैवी आहे,” अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे चतुर्वेदींवर टीका केली. तर दुसरीकडे, चतुर्वेदी यांनी याला उत्तर देताना, “हा दौरा राष्ट्रीय हितासाठी महत्त्वाचा असून, मतभेद असले तरी देशहितापुढे कोणतेही राजकारण गौण आहे,” असे ठामपणे सांगितले.
या संघर्षाची पार्श्वभूमी काही नवीन नाही. एप्रिल २०२५ मध्ये २६/११ हल्ल्याच्या आरोपी तहव्वुर राणा प्रत्यार्पण प्रकरणातही राऊत व चतुर्वेदी यांच्यात मतभेद झाले होते. त्यावेळीही दोघांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्या होत्या. सोशल मीडियावरही या वादाचे पडसाद उमटले आहेत. एका युजरने “राऊतची तळपायाची आग मस्तकाला गेली,” असा टोला लगावत चतुर्वेदींच्या निर्णयाचं समर्थन केलं. दुसऱ्याने खोचक प्रतिक्रिया देत लिहिलं, “चतुर्वेदी अमेरिकेला, राऊत धारावीत!” सध्या उद्धव ठाकरे यांनी या वादावर मौन बाळगलं असलं तरी पक्षातील गटबाजी अधिक तीव्र होत असल्याचं स्पष्ट होत आहे. या अंतर्गत संघर्षाचा शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) च्या एकजुटीवर आणि महाविकास आघाडीच्या भविष्यावर काय परिणाम होईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community