मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून अब्दुल सत्तार यांची खरडपट्टी

163
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून अब्दुल सत्तार यांची खरडपट्टी
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून अब्दुल सत्तार यांची खरडपट्टी

अकोल्यात कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या छापेमारीची राज्यात जोरदार चर्चा आहे. याच कथित धाडीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांसमोर ‘खरडपट्टी’ काढल्याचे समजते.

गेल्या आठवड्यात अकोल्यात कृषी विभागाकडून बियाणे विक्रेत्यावर धाडी टाकण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी कारवाईसाठी गेलेल्या पथकात काही खासगी लोकांचा देखील समावेश होता. हा सर्व प्रकार समोर आल्यावर या प्रकरणाची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत सत्तार यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी कान टोचले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अकोल्यातील छापेमारीवेळी पथकात खासगी लोकांचा समावेश कसा होता, असा सवाल सत्तार यांना विचारण्यात आला. तसेच यापुढील सर्व कारवाया कायदेशीर पद्धतीने झाल्या पाहिजेत. अशा घटनांनी सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याचे म्हणत शिंदे यांनी सत्तार यांना सुणावल्याचे समजते.

(हेही वाचा – Jitendra Awhad : चित्रा वाघ यांचा अपमान करणं पडलं महागात; जितेंद्र आव्हाड अडचणीत)

हा सर्व प्रकार गंभीर विषय असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर याचवेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सत्तार, तुमचे जे चालले आहे, ते वाईट आहे. तुम्ही कारभार सुधारा, असा बेबंदपणा बरा नाही. तर तुम्ही सरकारची पत धुळीला मिळवताय, या शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तारांना झापले, असल्याचे समजते.

सत्तारांकडून सारवासारवी…

अकोल्यातील प्रकरणावरून सत्तार यांनी सारवासारवी करत तेलंगणाचे उदाहरण देण्याचा प्रयत्न केला. बोगस बियाणे व खते विक्रीला चाप लावण्यासाठी आपल्याकडे कठोर कायदे नाहीत. तेलंगणात यासाठी विशेष कायदे असून, त्याप्रमाणे आपण देखील कायदा केला पाहिजे असे सत्तार म्हणाले. पण सत्तार यांची सारवासारव मुख्यमंत्री ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते असेही समजते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.