Maratha Reservation : अखेर मनोज जरांगे पाटील यांना भेटायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जालन्यात येणार

115

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवार, १३ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील  यांची जालन्यात जाऊन भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संध्याकाळी पाच वाजता आंतरवाली सराटी गावात पोहोचतील. दुपारी चार वाजता औरंगाबादच्या विमानतळावर पोहोचून अंतरवाली सराटी गावात जातील. त्यानंतर तिथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्याची विनंती करतील. त्यामुळे गेल्या सोळा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांचे उपोषण आज सुटणार का? असा प्रश्न आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी इथे येऊन उपोषण सोडवावे, अशी अट मनोज जरांगे पाटील यांनी ठेवली होती. ही अट देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. एकनाथ शिंदे हे अजित पवारांसह दुपारी मुंबईहून जालन्यासाठी रवाना होणार आहेत. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळे महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले आहे. लाठीमाराच्या घटनेनंतर राज्यभर ठिकाणी आंदोलन, रास्तारोको करण्यात आले होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी जाणार आहेत. त्यामुळे त्यांची आजचीही भेट अतिशय महत्त्वाची असणार आहे. यातून मराठा समाज समाधानी होईल का हे पाहावे लागेल.

(हेही वाचा Russia Praises India : रशियाने भारताकडून शिकण्यासारखे आहे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून कौतुक )

मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सदस्य देखील हजर राहण्याची शक्यता

यावेळी सरकारचे अनेक मंत्री त्यांच्यासोबत असतील अशी माहिती मिळत आहे. चंद्रकांत पाटील पुण्यातील प्रशासकीय बैठक टाळून अचानक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलावून घेतले आहे. अंतरवाली सराटी गावातील मनोज जरंगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यांच्या भेट देण्याच्या हालचाली सुरु आहे. चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख आहेत.

मुख्यमंत्री येत असतील तर स्वागत – मनोज जरांगे पाटील

मुख्यमंत्रीसाहेब येत आहेत, याचा अधिकृत निरोप मिळालेला नाही. तुमच्या माध्यमातून ते येत असल्याचं आम्हाला समजलं. येत असतील तर स्वागत आहे. मराठा समाजाने तुम्हाला वेळ दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी आमच्या मनात काही नाही. महिनाभर आम्ही वाट पाहणार, त्यांना महिनाभर काहीच बोलू शकत नाही. रात्री मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालं होतं पण वेळ सांगितली नव्हती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.