कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकांनी विशाळगडावर कोणताही सण किंवा उत्सव साजरा करण्यास मनाई केली आहे. उद्याच्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथे मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 2 दिवसांपूर्वी विशाळगडावर (Vishalgad Fort) बकरी ईदची कुर्बानी देण्यास परवानगी दिली होती. त्यापूर्वी केवळ उरुसावेळी स्थानिकांना अशी कुर्बानी देण्यास परवानगी होती. पण न्यायालयाच्या आदेशामुळे यावेळी भक्तानाही कुर्बानी देण्यास परवानगी मिळाली होती. पण आता कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी संभाव्य तणाव लक्षात घेता विशाळगडावर (Vishalgad Fort) कोणताही सण किंवा उत्सव साजरा करण्यास मनाई केली आहे. विशेषतः जिल्हा प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे शनिवार, ७ जूनला बकरी ईदच्या दिवशी काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
न्यायालयाचा तातडीने सुनावणी घेण्यास नकार
कोल्हापूर प्रशासनाने विशाळगडावर कुर्बानी देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे सध्या सर्वांचे डोळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे लागले आहेत. विशाळगड (Vishalgad Fort) बकरी ईद कुर्बानी प्रकरणात न्यायालयात तातडीने सुनावणी घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी कोल्हापूर प्रशासनाने केली आहे. विशाळगडावर (Vishalgad Fort) उत्पन्न होणाऱ्या संभाव्य कायदा सुव्यवस्थेचाही दाखला दिला आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. कोणताही धर्म किंवा श्रद्धा असो, संरक्षित स्मारकात काहीतरी गतिवीधी सुरूच असतात. त्या ठीक आहेत, असे मत न्यायालयाने या प्रकरणी नोंदवले आहे.
गेल्या वर्षी झाली होती दंगल
उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षी 14 जुलै रोजी विशाळगडावरील (Vishalgad Fort) अतिक्रमण काढण्याच्या मुद्यावरून मोठी दंगल घडली होती. त्यानंतर काही काळ पर्यटकांना गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. नंतरच्या काळात कुर्बानी देण्यावरही नियंत्रण आले. त्यानंतर विशाळगडावर झालेल्या उरुसावेळी फक्त स्थानिकांनाच कुर्बानी देण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने सदर ठिकाणी सर्वांना कुर्बानी देण्यास परवानगी दिली. पण कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणी विरोधाभासी भूमिका घेत विशाळगडावर (Vishalgad Fort) कोणताही सण किंवा उत्सव साजरा करण्यास मनाई केली. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तंग झाले आहे.
Join Our WhatsApp Community