राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी माफी मागावी, अन्यथा…; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

99

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधातील मोट पक्की बांधण्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांची वेगाने हालचाल सुरू झाली आहे. लवकरच काँग्रेस नेते राहुल गांधी मातोश्रीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण असून भाजप नेते देखील सतर्क झाले आहेत. या पार्श्वभूमीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधींना धमकी वजा इशारा दिला आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी माफी मागावी, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा बावनकुळेंनी दिला आहे.

नक्की काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

‘राहुल गांधींनी वीर सावरकरांचा पाच वेळा अपमान केला. आताही त्यांची भूमिका बदलली नाही आणि त्यांनी माफी सुद्धा मागितली नाही. महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांची माफी मागावी, मगच महाराष्ट्रात पाय ठेवावा, अशा इशारा बावनकुळेंनी दिला आहे.

दरम्यान वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना उद्धव ठाकरे यांनीही इशारा दिला होता. वीर सावरकरांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाहीत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत फूट पडणार अशी शक्यता होती. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मध्यस्थी केली आणि काँग्रेस सावरकरांचा मुद्दा पुन्हा मांडणार नाही, असे आश्वास दिले. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद संपुष्टात आल्याचे म्हटले जात आहे. अशातच आता राहुल गांधी थेट मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे संपूर्ण राज्याचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.

(हेही वाचा – ‘गंगा भागीरथी’वरील वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.