Bharat Jodo Nyay Yatra : राहुलबाबाची सभा ठरणार इंडि आघाडीच्या गोतास काळ…

Bharat Jodo Nyay Yatra : मीडियाने इतका गाजावाजा करूनही भारत जोडो न्याय यात्रेची सांगता ही सांगता सांगताच कधी झाली हे मीडियालाही बहुधा कळले नसावे. कारण, यात्रेची सांगता करताना झालेली इंडि आघाडीच्या लोकसभा प्रचाराची सभा म्हणावी तितकी परिणामकारक ठरलेली नाही

214
Bharat Jodo Nyay Yatra : राहुलबाबाची सभा ठरणार इंडि आघाडीच्या गोतास काळ...
Bharat Jodo Nyay Yatra : राहुलबाबाची सभा ठरणार इंडि आघाडीच्या गोतास काळ...
स्वप्नील सावरकर

शिवतीर्थावर झालेली इंडि आघाडीची ‘ऐतिहासिक’ सभा अनेक कारणांनी लक्षात राहणार आहे. मुळात ऐतिहासिक का, तर राहुल गांधी (Rahul Gandhi) पहिल्यांदा इथे आले खरे पण स्वातंत्र्यवीर सावरकरांवर एक अक्षरही उच्चारण्यास धजावले नाहीत. (Bharat Jodo Nyay Yatra) ज्या बाळासाहेबांनी राहुल गांधींच्या परिवाराची कायम लक्तरे काढली, त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन सत्तेचे राजकारण कुणाकुणाला काय काय करायला लावते, याचे राहुल गांधी द्योतक बनले. खरंतर उद्धवनी (Uddhav Thackeray) राहुलबाबाच्या मांडीला मांडी लावून बसण्यापासून, ‘जमलेल्या माझ्या तमाम…’ या भाषणाच्या सुरुवातीच्या वाक्यातून हिंदू शब्द गायब करून, सत्तेसाठी वाट्टेल ते, या उक्तीचं दर्शन घडवलेच आहे. उद्धवनी राजकारणासाठी स्वतःच्या नावात बापाचं नाव आवर्जून टाकायला सुरुवात केली असली, तरी बाळासाहेबांना त्यांच्या हिंदूहृदयसम्राट या पदवीतून मुक्त करण्याचं पापही यापूर्वी केलंय… आता या पापाचा घडा भरलाय की अजूनही रिक्त आहे, हे या लोकसभा निवडणुकीतून दिसून येणार आहेच.

रिकाम्या खुर्च्यांनी दिली गर्दीची साक्ष

इंडि आघाडीतील उरलेसुरले सर्व घटकपक्ष एकत्र आले, तेव्हा शिवतीर्थ ओसंडून वाहील आणि गर्दी थेट शिवसेना भवनापर्यंत जाईल की काय, असं वाटलं होतं. पण, असं काहीही घडलं नाही… गर्दी नक्की किती झाली याची साक्ष रिकाम्या खुर्च्या देत होत्या. त्यामुळे आपल्याला शक्तीप्रदर्शन फारसं करता आलं नाही, याचं दुःख या सर्वच नेत्यांना आतून नक्कीच झालं असणार. त्यातच राहुलबाबांनी मोदींच्या मुखवट्यामागील शक्तीविरोधातच खरी लढाई असल्याचं सांगितले. आणि, मोदींनी ही शक्ती म्हणजे जनतेची, महिलांची शक्ती असं सांगत राहुलबाबाचाच शक्तिपात घडवला आहे. अर्थात, हा शक्तिपात ठरतो की नाही, हे ४ जून २०२४ ला स्पष्ट होईलच. शाहू, फुले आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या या इंडि आघाडीला प्रकाश बेडकरांनी खडे बोल थेट व्यासपिठावरूनच सुनावले. एकत्र लढा किंवा वेगवेगळे पण लढा, असं सुनावत प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) आपली सिद्धता किती आहे, याचंच दर्शन घडवलं. आपल्याला अगदी ५ मिनिटेच भाषणाला दिली असल्याचे सांगत त्यांनी आठ मिनिटांपेक्षा जास्त वेळ भाषण केले.

जुने निष्ठावान सैनिक हतबल 

ज्या स्टॅलिननं सनातन धर्मावरच जहाल टीका केली होती. त्यालाच बगलेत घेऊन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र बसल्याचं अनेक जुन्याजाणत्या शिवसैनिकांना बघवत नव्हतं. त्यातच तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) तब्बल साडे तेरा मिनिटे बोलल्यावर ठाकरेंना मात्र साडेसात मिनिटात भाषण उरकावे लागले. शिवतीर्थावर पहिल्यांदाच असे घडले की, ठाकरेंच्या भाषणाआधी परंपरागत फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांच्या गर्जना नव्हत्या. अर्थात राहुल गांधी यांच्या भाषणाआधी मात्र ही आतिषबाजी बघायला मिळाली. त्यातच खडगे यांनी समारोपाचे भाषण ३३ मिनिटे करत हा इंडि आघाडीचा नव्हे, तर काँग्रेसचा मेळावा असल्याचे दाखवून दिले. पण, करायचं तरी काय? हतबल झालेले जुने निष्ठावान सैनिक मात्र आता उद्या जनतेला सामोरे कसे जायचे, या विचारात होते.

सांगता सांगताच झाली सांगता 

आणि शेवटची गंमत म्हणजे, व्यासपीठावर जमलेल्या बहुतेक सर्व नेत्यांचे हात भ्रष्टाचारात बरबटलेले असल्याने सर्वांनीच इडी, सीबीआयसारख्या संस्थांविरोधात भूमिका घेतानाच इव्हीएमविरोधात पुन्हा बोंबाबोंब करण्याचं काम मनोभावे सुरू केलंय. असो, इतका गाजावाजा मीडियाने करूनही भारत जोडो न्याय यात्रेची सांगता ही सांगता सांगताच कधी झाली हे मीडियालाही बहुधा कळले नसावे. कारण, यात्रेची सांगता करताना झालेली इंडि आघाडीच्या लोकसभा प्रचाराची सभा म्हणावी तितकी परिणामकारक ठरलेली नाही, हेही तितकंच खरं… (Bharat Jodo Nyay Yatra)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.