-
प्रतिनिधी
“मुंबई महापालिकेने मागील 20 वर्षांत नालेसफाई, मिठी नदी स्वच्छता, ब्रिमस्टोवँडसारख्या प्रकल्पांवर 1 लाख कोटी रुपये खर्च केले तरी मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात तुंबलेले रस्ते आणि बुडालेली घरे दिसतात, मग एवढ्या खर्चाचे काय झाले?” असा थेट सवाल करत मुंबई उपनगर पालकमंत्री आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर थेट बेईमानीचा आरोप केला आहे.
शेलार (Ashish Shelar) यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन मागील 20 वर्षांतील खर्चाची ‘श्वेतपत्रिका’ सादर करण्याची मागणी केली. शेलार म्हणाले, “मुंबईकरांची ही बेईमानी आहे. आम्हाला मागील तीन वर्षांचा हिशेब विचारण्याआधी त्यांनी त्यांचा 20 वर्षांचा हिशेब द्यावा!”
(हेही वाचा – FundKaveriEngine : सोशल मीडियावर ट्रेंड होणारं ‘कावेरी’ नेमकं आहे तरी काय?, वाचा सविस्तर)
प्रमुख आरोप आणि मागण्या :
- ब्रिमस्टोवँड प्रकल्प अद्याप अपूर्ण, 2017 पर्यंत किती निधी खर्च झाला याचा खुलासा मागवला.
- मिठी नदीतून काढलेल्या गाळाचे गैरव्यवहार, मृत व्यक्तींच्या नावाने करार, गाळ टाकण्याच्या जागेवर ग्रामपंचायतीचा दावा नाही.
- पाथमुखांची उंची वाढवण्याचे काम झालेच नाही, भरती रेषेखाली असलेल्या नाल्यांमुळे दरवर्षी पूरस्थिती.
- झाडांच्या छाटणीसाठी पालिकेचे जास्त शुल्क, अपघात टाळण्यासाठी ही सेवा मोफत देण्याची मागणी.
- दरडग्रस्त ठिकाणांवर संरक्षक जाळ्यांचा अभाव, निधीअभावी महत्त्वाची कामे रखडली – पालिकेने निधी द्यावा.
- ब्रिटानिया पंपिंग स्टेशन फेल, कारण ठरली “एईडब्ल्यू” कंत्राटदार कंपनीला देण्यात आलेली सवलतीची निविदा.
- कोस्टल रोडच्या भरावात निकृष्ट दर्जाचा वापर, ठाकरे सरकारने निकष शिथिल करून बगलबच्च्यांना फायदे दिले.
- रस्त्यांची अवस्था दयनीय, अपूर्ण रस्ते आणि वाहतुकीचा खोळंबा दूर करण्याचे निर्देश.
(हेही वाचा – Suicide : स्किझोफ्रेनिया ग्रस्त तरुणीची २३ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या)
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बैठकीत सांगितले की, “पाऊस 15 दिवस आधीच सुरू झाल्याने कामांचे नियोजन कोलमडले. मिठी नदी स्वच्छतेचे 55% काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम 8 दिवसांत पूर्ण करू. पंपांची संख्या वाढवून तुंबणाऱ्या ठिकाणी 24 तासांत यंत्रणा उभी केली जाईल.
शेलार (Ashish Shelar) यांनी स्पष्ट इशारा दिला की, “आता पुढील आठ दिवस भाजपा पदाधिकारी आणि माजी नगरसेवक प्रत्येक कामावर नजर ठेवणार आहेत. जर दुर्घटना घडली, तर त्यासाठी पालिका आयुक्तांना जबाबदार धरले जाईल.” या आरोपांमुळे शिवसेना उबाठावर दबाव वाढला असून, मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शेलारांच्या या घणाघातानंतर मुंबईकर आता श्वेतपत्रिकेच्या प्रतिक्षेत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community