-
प्रतिनिधी
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४० जागांचा निर्णायक विजय मिळवून दिल्याबद्दल मुंबई भाजपा अध्यक्ष व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. याच वेळी, त्यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कडाडून टीका केली.
“सामान्य कष्टकरी दिल्लीकरांचा ‘मफलर’ने गळा घोटणाऱ्या, फसवणाऱ्या आणि संधीसाधू राजकारण करणाऱ्या लोकांची दिल्लीकरांनी साफसफाई केली आहे. आता ‘झाडूला’ कायमचे सत्तेबाहेर फेकले आहे,” अशा शब्दांत त्यांनी केजरीवाल आणि त्यांच्या पक्षावर हल्लाबोल केला.
मोदी-शाह यांच्या रणनीतीचे कौतुक
शनिवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री शेलार (Ashish Shelar) यांनी भाजपाच्या या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कुशल नेतृत्वाला दिले. त्यांनी दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांचेही आभार मानले.
“दिल्ली आणि देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास म्हणजे राष्ट्रवादी विचारधारेच्या बाजूनेच शिक्कामोर्तब,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
(हेही वाचा – Hindu Temple : हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे संघटन निर्माण करू; Minister Nitesh Rane यांचे आश्वासन)
काँग्रेस आणि राहुल गांधींवरही जोरदार टीका
मंत्री शेलार (Ashish Shelar) यांनी यावेळी काँग्रेस आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका केली.
“दिल्लीकरांनी काँग्रेसला ‘मोठा भोपळा’ देत त्यांची खरी जागा दाखवून दिली आहे. आता राहुल गांधी आणि काँग्रेस ईव्हीएमला दोष देत अपयश झाकण्याचा कार्यक्रम अजून जोरात करतील,” असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरेंवरही बोचरी टीका
काँग्रेसवर सडकून टीका करताना मंत्री शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मिश्किल शैलीत टोमणे मारले.
“आम्ही महाराष्ट्र जिंकलाच, पण आता राजधानी दिल्लीही जिंकली आहे. आता आर्थिक राजधानी मुंबईतही असाच बदल घडवून, गेली २५ वर्षे पालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांना घरी बसवणारच…!” अशा तीव्र शब्दांत त्यांनी शिवसेना उबाठावर निशाणा साधला.
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर भाजपाने जल्लोष व्यक्त करत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केजरीवाल, काँग्रेस आणि शिवसेना उबाठावर कठोर शब्दांत टीका करत भाजपाच्या आगामी रणनीतीचा इशारा दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community