
-
प्रतिनिधी
राजकारणात काही नात्यांना विसरणं कठीण असतं, आणि ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ हे त्यातलंच एक उदाहरण. गेल्या काही आठवड्यांपासून राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील का, यावर चर्चांचा भडिमार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी दिलेल्या थेट प्रतिक्रियेमुळे या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. “मिडियात चर्चा करून काही साध्य होणार नाही. राज आणि उद्धव ठाकरे यांनी थेट एकमेकांशी बोलले पाहिजे,” असा स्पष्ट सल्ला अमित ठाकरे यांनी दिला आहे.
महापालिका निवडणुका – ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का?
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत “एकत्र येण्याबाबत विचार व्हायला हवा” असा संकेत दिला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यामुळे मुंबई महापालिकेसाठी ठाकरे कुटुंबात ‘राजकीय युती’ होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र दरम्यान, उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर गेले आणि चर्चा काहीशा थंडावल्या. पण आता या चर्चेला अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यामुळे पुन्हा जिवंततेची झळाळी मिळाली आहे.
(हेही वाचा – Arthur Road Jail : कारागृहाच्या पुनर्विकासाबाबत शासनाचा महत्त्वपूर्ण आदेश; प्रस्ताव सादर करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे निर्देश)
“खाली कोणी बोलून उपयोग नाही” – अमित ठाकरे
अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले, “कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, राज ठाकरे यांनी स्वतः फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे नात्यांचं हे बंध अजूनही तुटलेलं नाही. पण या सगळ्यावर मीडियात चर्चा करून काही होणार नाही. दोघा भावांनीच समोर बसून बोलावं.” त्यांनी पुढे नमूद केलं की, “राजकीय भांडणांवर फिनिशिंग टच फक्त दोघेच देऊ शकतात.”
आदित्य ठाकरे यांचा सकारात्मक सूर : “सोबत घेऊन लढू”
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही युतीबाबत आशावाद व्यक्त केला आहे. “मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जर कोणी आमच्यासोबत यायला इच्छुक असेल, तर आम्ही त्यांना सोबत घेऊन लढायला तयार आहोत,” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. यावर अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले, “आदित्यकडे त्याच्या काकांचा (राज ठाकरेंचा) नंबर आहे, थेट बोलायला काय हरकत आहे?” अशी मिश्कील पण मार्मिक टिप्पणीही केली.
(हेही वाचा – BMC School : महापालिकेच्या शाळेत यंदा पहिल्याच दिवशी मिळणार मोफत शालेय साहित्य)
२०१४ ची पार्श्वभूमी, २०२५ मध्ये नवा अध्याय?
२०१४ पासून दोन्ही पक्षांमध्ये कटुता वाढली होती. मनसेच्या माघारीमुळे शिवसेनेला वाटलेले राजकीय फायदे आणि त्यानंतरचा टोकाचा संघर्ष सर्वश्रुत आहे. पण आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंमध्ये ‘राजकीय समेट’ होईल का, हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे.
एकत्र यायचं तर थेट समोरासमोरच!
राजकारणात एकत्र येणं हे ‘टाइमिंग’वर अवलंबून असतं. सध्या ठाकरे बंधूंमध्ये बोलचाल झाली तर त्याचे फक्त राजकीयच नव्हे तर भावनिक परिणामही दिसतील. “सत्तेच्या गणितापेक्षा नात्यांचं समीकरण जुळलं, तरच ठाकरे परत एकत्र येऊ शकतील,” असं निरीक्षण सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. राज-उद्धव पुन्हा एकत्र येणार का, की ही चर्चा फक्त ‘पुन्हा एकदा गाजलेली अधुरी गोष्ट’ ठरणार? हे लवकरच स्पष्ट होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community