Ajit Pawar : शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवारांचा खुलासा, म्हणाले…

360
बारामतीच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केली. बोलण्याच्या ओघात त्यांनी निवडणुकीत कदाचित ही माझी शेवटची निवडणूक आहे’, असं भावनिक आवाहन केले जाईल, असे म्हटले. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवरांवर जोरदार टीका केली. त्यानंतर अजित पवार यांनी त्यावर खुलासा केला आहे.

काय म्हणाले अजित पवार? 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, लोकसभा निवडणुकीत कदाचित माझी ही शेवटची निवडणूक आहे, असे सांगत भावनिक केले जाईल, पण कधी शेवटची असणार काय माहित? असा टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला होता. त्यावर अनेकांनी टीका केली. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत सडकून टीका केली होती. त्यावर आता अजित पवार यांनी खुलासा केला आहे. माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझे पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढेच म्हणणे होते  की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी, हे मत मी पूर्वी देखील मांडलेले आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना या गोष्टी कळणार नाहीत. काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही, असे म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची वाट बघणे, याचना करणे कितपत योग्य आहे? आपल्या चुलत्यांच्या मृत्यूची वाट पाहणे हे काय राजकारण आहे का? अजितदादा… असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला होता. बारामतीकर अशा माणसाला त्याची जागा दाखवतील. आधी आपली उंची बघावी आणि शरद पवार कुठे आहेत अन् तुम्ही कुठंय ते पाहावं. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याचा.., असं म्हणत आव्हाडांनी संताप व्यक्त केला होता.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.