Vice President Jagdeep Dhankhar : काही मूठभर लोक भारताची प्रतिमा डागाळत आहेत; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे विधान

114

काही मुठभर लोक देशाची प्रतिमा डागाळत असल्याची टीका उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhar) यांनी केली. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात रविवारी, 24 डिसेंबर रोजी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ‘पर्सन ऑफ एक्शन’ म्हणून कौतुक केले.

याप्रसंगी उपराष्ट्रपती धनखड (Vice President Jagdeep Dhankhar) म्हणाले की, काही मूठभर लोक भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताची जागतिक पातळीवर सातत्याने प्रगती होत असताना हे मूठभर लोक त्याला कलंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी देशातील तरुणांनी मौन बाळगू नये. जेव्हा आमचा एक संसद सदस्य हार्वर्डला जातो आणि भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचे सांगतो तेव्हा मला वाईट वाटते. तर भारत हा जगातील एकमेव देश आहे जिथे खेड्यापासून संसदेपर्यंत लोकशाही असल्याचे धनखड यांनी सांगितले.

(हेही वाचा Koregaon Bhima : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ८ ते १२ जानेवारीदरम्यान आयोगाची सुनावणी)

कायदा आणि सुव्यवस्था चिंतेचा विषय

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात नावलौकिक मिळवला आहे. आज आदित्यनाथ हे पर्सन ऑफ ऍक्शनचे प्रतीक बनले आहेत. यापूर्वी उत्तरप्रदेशात काय परिस्थिती होती हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कायदा आणि सुव्यवस्था आणि विकासाच्या दृष्टिकोनातून हे राज्य सर्वांच्या चिंतेचा विषय होते. परंतु, आजघडीला उत्तरप्रदेश कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत देशातच नाही तर जगात रोल मॉडेल बनल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रीमियम श्रेणीतील उद्योगांसाठी उत्तरप्रदेश आवडते ठिकाण बनले आहे हे सांगताना त्यांना आनंद होत आहे. गौतम बुद्ध विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ हा इतर सर्वांपेक्षा वेगळा आहे. गौतम बुद्ध विद्यापीठ नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांच्या पातळीवर आणण्याची मागणीही उपराष्ट्रपतींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ही मागणी 100 टक्के पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.