रॉकेट लावायला मनाई केली म्हणून अल्पवयीन टोळीने त्याची हत्याच केली,मानखुर्द येथील घटना

124

दिवाळीचे फटाके फोडण्यावरून झालेल्या वादात २१ वर्षीय तरुणाची १२ आणि १४ वर्षांच्या तिघांनी धारदार शस्त्राने हत्या केली आहे. ही घटना पूर्व उपनगरातील मानखुर्द परिसरात सोमवारी दुपारी घडली आहे. या हत्येने मानखुर्द परिसरात एकच खळबळ उडवून दिली आहे. तिघांपैकी दोघांना शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून १२ वर्षांचा मुख्य आरोपी फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

रॉकेट लावण्यावरुन वाद

सुनील शंकर नायडू (२१) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.सुनील हा मानखुर्द येथील नटवर पारेख कंपाऊंड इमारत क्रमांक १५ या ठिकाणी राहत होता. सोमवारी दुपारी दिवाळी निमित्त १२ वर्षांचा आरोपी हा इमारतीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात काचेच्या बॉटलमध्ये दिवाळीचे रॉकेट लावत होता. त्यावेळी सुनील तिथे आला व त्याने त्याला रॉकेट लावण्यास मनाई केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि १२ वर्षीय आरोपीचा १४ वर्षांचा भाऊ आणि त्याचा मित्र अशा तिघांनी मिळून सुनीलला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी १४ वर्षांच्या आरोपीने स्वतःजवळ असलेल्या धारदार शस्त्राने सुनीलच्या गळ्यावर वार करून त्याची हत्या केली.

(हेही वाचाः भायखळ्यातील पेट्रोल पंपावरील दरोड्याची उकल, दोघांना अटक)

मुख्य आरोपी फरार

या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनीलला शताब्दी रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी सुनीलला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. १२ वर्षांचा मुख्य आरोपी मात्र फरार झाला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.