Sam Manekshaw : १९७१च्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या सॅम माणेकशॉ यांचा काँग्रेसने थांबवला होता ३० वर्षे पगार

458
  • नित्यानंद भिसे

भारतीय सैन्य दलाने मोठ्या हिमतीने १९७१चे पाकिस्तानविरुद्धचे युद्ध जिंकले. त्या लढाईचे नेतृत्व फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (Sam Manekshaw) यांनी केले. त्यांच्या या शौर्यामुळेच त्यांना फिल्ड मार्शल ही पदवी दिली. पण दुर्दैव त्यांचे हे योगदान नोकरशहा वर्गाच्या डोळ्यांत खुपले. त्यांनी त्यांच्या विरोधात कट रचून त्यांच्याविरोधात वातावरण निर्मिती केली, ज्यामुळे तेव्हाच्या काँग्रेस सरकारने त्यांचे वेतन तब्बल ३० वर्षे थांबवले, मृत्यूसमयी त्यांना ते वेतन देऊन त्यांनी केलेल्या देशसेवेची अक्षरशः काँग्रेसने थट्टा केली, ही त्यांच्या प्रति कृतघ्नता आहे, असे परखड मत सेवानिवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ सोबत बोलतांना मांडले.

सॅम माणेकशॉ यांच्या विरोधात असा रचला कट

१९७१च्या युद्धात सॅम माणेकशॉ (Sam Manekshaw) हे देशाच्या तिन्ही दलांचे नेतृत्व करत होते. त्यांना त्याप्रमाणे निर्देश देत होते. त्यांना ९ गोळ्या लागल्या, तरीही ते लढाई करत होते. अशाप्रकारे सॅम माणेकशॉ यांनी भारताला मोठा विजय मिळवून दिला. सरकारने त्यांना फिल्ड मार्शल पदवी देऊन सन्मानित केले खरे पण त्यांचे हे यश नोकरशहा वर्गाच्या डोळ्यांत खुपत राहिले. ज्यामुळे त्यांनी त्यांच्या विरोधात कट रचला. माध्यमांना हाताशी धरून एका अनौपचारिक चर्चेत माध्यमांनी त्यांना विचारले की, तुम्ही पाकिस्तानात गेला असता तर काय केले असते, तेव्हा सॅम माणेकशॉ (Sam Manekshaw) हसत म्हणाले, मी पाकिस्तानही जिंकला असता. त्यांच्या या वक्तव्याचा विपर्यास करत नोकरशहांच्या आदेशानुसार काही माध्यमांनी ‘१९७१चे युद्ध आपण जिंकले असे माणेकशॉ (Sam Manekshaw) म्हणत आहेत’, असा गवगवा करायला सुरुवात केली. ज्यामुळे त्यावेळी काँग्रेस सरकारने त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे वेतन थांबवण्याचा निर्णय घेतला. हे वेतन तब्बल ३० वर्षे थांबवले. ज्या सैन्याधिकाऱ्याने आपल्या शौर्याच्या जोरावर देशाला युद्धात मोठा विजय मिळवून दिला. त्या सैन्याधिकाऱ्याला निवृत्तीच्या काळात खर्चाला पैसे नव्हते, कारण सरकारने त्यांचे वेतन थांबवले, निवृत्तीनंतरचे सेवानिवृत्ती वेतन थांबवले. जेव्हा ते मृत्यूशय्येवर होते, तेव्हा त्यांना त्यांचे वेतन आणि सेवानिवृत्ती वेतन देऊन त्यांची कुचेष्ठा केली. त्यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हाही ना तेव्हाच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील गेल्या ना पंतप्रधान मनमोहन सिंग ना संरक्षण मंत्री ए. के. अँटनी गेले, ही आणखी एक कृतघ्नता म्हणावी लागेल. याउलट अमेरिकेत छोट्या जवानापासून मोठ्या सेनाधिकाऱ्याला सॅल्यूट केला जातो, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

(हेही वाचा Halal Ban: उत्तर प्रदेशात हलाल बंदी; महाराष्ट्रात कधी?)

युद्धाचे श्रेय कोणा एकाचे नाही 

१९७१च्या युद्धाचे श्रेय इंदिरा गांधी यांनाही दिले पाहिजे, कारण त्या तेव्हा पंतप्रधान होत्या. त्यावेळी पाकिस्तान, चीन आणि अमेरिका हे तिन्ही देश आपल्या विरोधात होते, तेव्हा इंदिरा गांधी यांनी हा विषय सोव्हिएत संघात नेला आणि पूर्व पाकिस्तानात शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश येत नाही म्हटल्यावर त्यांनी युद्धाची रणनीती आखली आणि युद्ध जिंकले. पण त्यावेळी युद्धाची रणनीती ठरवताना अनेक सेनाधिकाऱ्यांचाही सहभाग होता. त्यांनीही यात मोठे योगदान दिले. त्यामुळे या युद्धाचे श्रेय कुणाला एकाला देता येणार नाही हे सामूहिक यश होते, असे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल जी. डी. बक्षी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.