Operation SINDOOR : भारताचे संरक्षण प्रमुख सांगतात, युद्धामध्ये क्षति झाली होती

115
विंग कमांडर विनायक पुरुषोत्तम डावरे (निवृत्त)

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज (IISS) ने आयोजित केलेला “शांग्रिला  संवाद-2025” सिंगापूरमध्ये 30 मे ते 1 जून 2025 सम्पन्न झाला. आशिया खंडातील प्रमुख देशांचे संरक्षणमन्त्री या सभेमध्ये प्रादेशिक-सुरक्षा क्षेत्रांत जाणवणाऱ्या समस्यांवर चर्चा करतात. तेथे भारताच्या प्रतिनिधी-मंडळाचे नेतृत्व भारताचे संरक्षण-प्रमुख जनरल अनिल चौहान (Chief of the Defence Staff, CDS) यांनी केले. ब्लूमबर्ग या वार्तासंस्थेने सिंगापूरमध्ये घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीमध्ये विचारलेल्या “ऑपेरेशन सिंदूर” (Operation SINDOOR) मधील Losses बाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देतांना, जनरल चौहान (Anil Chauhan) म्हणाले:

“On the 7th (May) and initial stages, there were losses, but the numbers, and that was not important; what was important was why did the losses occur, and what we will do after that. So, we rectified tactics and went back on the 7th, 8th, and 10th, and 10th in large numbers to hit air bases deep inside Pakistan. Penetrated all their air defences with impunity, carried out precision strikes. The Air Force went into a short mode, as to why did this happen. They rectified their tactics, and flew in again, and flew all types of aircraft, with all types of ordnances on the 10th. Most strikes were delivered with pinpoint accuracy.”

New Project 36 1
जनरल अनिल चौहान Chief of the Defence Staff (CDS)

मराठी भाषांतर: “(मे महिन्याच्या) सात तारखेला आणि सुरवातीला काही क्षति झाली, परंतु किती संख्या, हे महत्वाचे नाही; “क्षति कां झाली आणि आम्ही त्याबाबत काय करणार” हे जास्त महत्वाचे आहे. त्यानंतर आम्ही आमचे तन्त्र बदलून जास्त संख्येने परत रणांगणावर सात, आठ आणि दहा तारखांना उतरून, पाकिस्तानमधील अति दूरच्या हवाई-तळांवर अचूक हल्ले केले. ‘असे कां घडले’ याचे विश्लेषण करून आणि सुधारित तन्त्र वापरून, वायुसेनेने अनेक प्रकारची विमाने आणि त्यांवरील विविध शस्त्रास्त्रे वापरून, दहा तारखेला अनेक तळांवर हल्ले केले. जवळजवळ सर्व हल्ल्यांचा मारा अत्यंत अचूकपणे केलेला होता.”

भारतीय वार्तापरिषदांमध्ये आत्तापर्यंत क्षति (Losses) बद्दल काहीच वक्तव्य नव्हते. सिंगापूरमधील ब्लूमबर्गच्या मुलाखतीमध्ये CDS यांनी प्रथमच “there were losses” असे विधान केले. त्यामुळे भारतांतीलच नव्हे तर जगातील सर्व माध्यमे (विशेषतः सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रे आणि वाहिन्या) त्या विधानाचे स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावून, आपापल्या धारणेनुसार त्यावर भाष्य करीत आहेत. CDS यांच्या विधानातील “क्षति (Losses)” मध्ये विमानांचा कोठलाही उल्लेख नसतांना, माध्यमांनी आपापले विमानांचे प्रकार सांगून, त्यांची संख्या सुद्धा स्वतःच ठरवली.

“शांग्रिला संवाद” सारख्या जागतिक मंचावर मुलाखत देतांना, भारताचे संरक्षण-प्रमुख जनरल अनिल चौहान (Chief of the Defence Staff, CDS) यांनी अतिशय समर्पक आणि सयुक्तिक भाष्य केल्याबद्दल त्यांचे अभिनन्दन करावयास हवे. क्षति (Losses) ला महत्व ना देतां, “क्षति कां झाली आणि आम्ही त्याबाबत काय करणार” (Why did the losses occur, and what we will do after that) याचे महत्व त्यांनी जागतिक मंचाला, आणि विशेषतः जागतिक माध्यमांना, समजावून संगितले. वास्तविक भारतीय सशस्त्र सेनादलांमध्ये अशी प्रक्रिया स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) पद्धतीने फार पूर्वीपासून वापरली जाते.

New Project 37 1
एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह, वायुसेनाध्यक्ष

अजून एक विवादात्मक मुद्दा गेल्या काही दिवसांमध्ये माध्यमांच्या चर्चेमध्ये येतो. भारतीय वायुसेनाध्यक्ष, एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह (Amar Preet Singh), यांनी वायुसेनेसाठी बनविल्या जाणाऱ्या विमानांच्या डिलिव्हरीमध्ये झालेल्या उशीरांवर काही भाष्य केले होते. संरक्षण-साहित्य उत्पादनाच्या बाबतीत भारतातील राजकीय नेतृत्वाची उदासीनता सात दशकांची आहे. परंतु त्याचे खापर सद्य शासनाच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न काही माध्यमे करीत आहेत. वास्तविक माध्यमांच्या अशा भूमिकेमुळे, भारतीय सशस्त्र सेनादलांच्या नेत्यांच्या खुल्या चर्चेला बाधा येते. संरक्षण-साहित्य उत्पादनाचा दुसऱ्या महायुद्धापासूनचा इतिहास पाहिल्यावर ध्यानात येते की, निजी-उद्योग क्षेत्राच्या सहयोगाशिवाय, संरक्षण-साहित्य उत्पादनाला योग्य तो वेग येत नाही. वायुसेनाध्यक्ष, एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांना त्यांच्या भाष्याद्वारा हेच सुचवायचे होते.

New Project 38 1
फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ

या संदर्भात सन 1971 च्या तेरा दिवसांच्या युद्धामध्ये पाकिस्तानचा सपशेल पराभव करून, 93,000 पाकिस्तानी सैन्याला शरण आणणारे, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ (Sam Manekshaw) यांनी सांगितलेली आठवण उद्घृत करावीशी वाटते. शिमला-करारानंतर पाकिस्तानी शासनाने फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना पाकिस्तानात (Pakistan) आमंत्रित केले होते. भारतीय शासनाच्या सम्मतीने फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ पाकिस्तानचा यशस्वी दौरा करून परतले. अनेक वर्षानंतर त्या दौऱ्यातील एक प्रसंग, त्यांनी एका मुलाखतीत वर्णन करून सांगितला होता. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या सन्मानार्थ पाकिस्तानी पंजाब प्रांताचे गव्हर्नर यांनी लाहोरमध्ये एक मेजवानी दिली होती. त्यावेळी गव्हर्नर यांनी फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना विचारले की, “आमच्या काही सैनिकांचे वडील आपली भेट घेऊ इच्छितात. आपण त्यांना भेटाल काय?” भेटल्यानंतर त्या पाकिस्तानी सैनिकांच्या वडिलांनी आपापली पागोटी फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या पायावर ठेऊन नमस्कार केला. कारण विचारल्यावर ते म्हणाले, “आमची मुले आपली युद्धकैदी असतांना, आपण त्यांची स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेतलीत त्याबद्दल धन्यवाद.” फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचे उत्तर होते, “शत्रूचे असले तरी, तेही सैनिक आहेत. स्वदेशासाठी ते प्राणपणाने लढले. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवलाच पाहिजे.” शत्रूच्या सैनिकांच्या वडिलांच्या इतक्या उदात्त भावना, तर स्वदेशी शासनाने अनेक वर्षे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना त्यांचे पेन्शनही दिले नव्हते. पुढे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ मृत्यूशैय्येवर असतांना, राष्ट्रपती अब्दुल कलाम त्यांच्या आज्ञेवरून त्यांना त्यांचे अनेक वर्षांचे पेन्शन देण्यात आले. हा इतिहास आहे.

युद्धकाळामध्ये भारतीय सैनिकांची आठवण केली जाते. मात्र एरवी सैनिकांबद्दल अनास्थाच दिसते. काही भारतीय सांसदांनी तर सैनिकांबद्दल अनुदार उद्गार काढल्याचे सर्वश्रुत आहे. भारतीयांनी अनेक उत्तम विदेशी प्रघात आत्मसात केले. परंतु सैनिकांचा आणि सैनिकी नेतृत्वाचा सुयोग्य सन्मान करण्याची संस्कृती आत्मसात करण्यात काही कमतरता राहिली असे वाटते.

सन 1965 आणि 1971 च्या युद्धांत सक्रिय भाग घेतलेला एक सैनिकी नेता म्हणून, लेखक एक खुलासा करू इच्छितो की, सैनिकी नेत्यांची विधाने सरळ आणि थेट हृदयापासून आलेली असतात. त्यांना राजकीय नेत्यांसारखी विधाने आणि भाष्ये करतां येत नाहीत. कृपया त्यांच्या विधानांचे आणि भाष्यांचे हवे तसे अर्थ न लावतां, त्यांना “सरळ आणि थेट हृदयापासून आलेली” याच संदर्भामध्ये पाहावे.

ऑपरेशन सिंदूर नंतर, त्या विषयावर आपण प्रथम सनसनाटी वार्ता देऊन आपला TRP कसा वाढवावा याचा विचार विविध माध्यमे निश्चितच करीत असणार. त्यांना एकच विनंती आहे की, आपापल्या धारणा स्वतःजवळ ठेवून, केवळ सत्य समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करावा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.